भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावर २०१४मध्ये भाजपचे वरिष्ठ नेते अरुण जेटली यांना विराजमान होता यावे, याकरिता २०१२मध्ये घटनादुरुस्ती करण्यात आली होती. एन. श्रीनिवासन यांना अध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाळ घालवता यावा यासाठी हे बदल करण्यात आले नव्हते, असे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी सांगितले.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर ज्या विभागाची दावेदारी असेल त्या विभागाकडून सूचक व अनुमोदन मिळाल्यास अन्य विभागाच्या व्यक्तीला अध्यक्षपद भूषवता येऊ शकेल, अशा प्रकारची घटनात्मक तरतूद २०१२मध्ये करण्यात आली होती.
‘‘दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व बीसीसीआयचे उपाध्यक्ष जेटली यांना पूर्व विभागाकडून सूचक-अनुमोदक मिळतील आणि ते अध्यक्षपद सांभाळू शकतील असे मला वाटले होते. सर्व सदस्यांकडून जेटली यांच्या नावाला बिनविरोध होता. त्यामुळे फक्त त्यांच्याकरिता हे बदल करण्यात आले होते,’’ असे मनोहर यांनी सांगितले.