* रैनाचे दमदार शतक; शेष भारत सर्व बाद ५२६
* मुंबईचे शेष भारताला २ बाद १५५ असे चोख उत्तर
* वासिम जाफर, अजिंक्य रहाणे यांची अर्धशतके

न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटी डावात त्याला भोपळाही फोडता आला नव्हता.. त्यानंतर कसोटी संघातून त्याची उचलबांगडी झाली.. पण इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धावांच्या राशी उभारत त्याने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला. त्यानंतर तोच फॉर्म कायम ठेवत भारतीय संघाची शिडी समजल्या जाणाऱ्या इराणी करंडकात सुरेश रैनाने सुरेख शतक झळकावत भारतीय संघाचा दरवाजा ठोठावला आहे. तळाच्या फलंदाजांना साथीला घेत रैनाने आपल्या खास शैलीत हवाई हल्ले करत मुंबईची गोलंदाजी निष्प्रभच असल्याचे सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही दाखवून दिले. वैयक्तिक कामगिरीसाठी सुवर्णसंधी असलेल्या इराणी करंडकात ‘मौके पे चौका’ मारत मुरली विजयने सलामीवीरासाठी, तर रैनाने सहाव्या क्रमांकासाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे. शेष भारत संघाच्या ५२६ धावांना मुंबईने चोख उत्तर दिले ते वासिम जाफर आणि अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकांच्या जोरावर. मुंबईने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद १५५ अशी दमदार मजल मारली असून ते अजूनही ३७१ धावांनी पिछाडीवर आहेत.
गुरुवारी सकाळच्या सत्रात रणजी करंडकविजेत्या मुंबईने हरभजन सिंगला (१६) झटपट बाद करत चांगली सुरुवात केली, पण रैनाने अप्रतिम फलंदाजीचा नजराणा पेश करत मुंबईच्या गोलंदाजीतील हवा काढून टाकली. मुंबईच्या वेगवान गोलंदाजांबरोबरच फिरकीपटूंचाही त्याने खरपूस समाचार घेत संघाला ५०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. अप्रतिम पदलालित्य आणि जोरदार फटके लगावत एकदिवसीय शैलीत फलंदाजी करणाऱ्या रैनाने १४ चौकार आणि ५ षटकार लगावत १६९ चेंडूंत १३४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. यावेळी आठव्या क्रमांकावरील अभिमन्यू मिथुनची (५१) त्याला चांगली साथ मिळाली. मिथुनने आपली ५०वी धाव घेत रैनाबरोबर सातव्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी आणि संघाच्या ५०० धावा असा योगायोग साधला. पहिल्या सत्रातील ३१ षटकांत मुंबईने एकमेव बळी मिळवत १५७ धावा दिल्या.
उपाहारानंतर मात्र जादूची कांडी फिरली आणि फक्त ३२ मिनिटांतच शेष भारतीय संघाचा डाव आटोपला. अंकित चव्हाणने मिथुन आणि रैना या दोघांनाही बाद केले आणि मुंबईला हायसे वाटले. यावेळी मुंबईने तब्बल २७ अवांतर धावा शेष भारत संघाला आंदण दिल्या. त्यानंतर मुंबईच्या डावात जाफरने पहिल्याच षटकात एस. श्रीशांतला दोन चौकार लगावत धमाकेदार सुरुवात करून दिली. श्रीशांतची गोलंदाजी बंद करून कर्णधार हरभजन सिंगने अभिमन्यू मिथुनला गोलंदाजी दिल्यावरही वासिमचा हल्लाबोल चालूच राहिला. चौकाराने सुरुवात करणारा आदित्य तरे (६) झटपट बाद झाल्यावर जाफर आणि अजिंक्य रहाणे यांची जोडी चांगलीच जमली. या दोघांनी भारताकडून खेळलेल्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. चौकारांबरोबर एकेरी-दुहेरी धावत घेत या दोघांनी शेष भारताच्या गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. पहिल्यांदा वासिमने मिथुनला चौकार ठोकत प्रथम श्रेणीतील ८०वे अर्धशतक फटकावले, मग रहाणेनेही ईश्वर पांडेला चौकार लगावत २२वे अर्धशतक पूर्ण केले. ही जोडी मुंबईला मोठय़ा धावसंख्येच्या दिशेने नेणार, असे वाटत असतानाच एस. श्रीशांतने पुरेपूर बदला घेत जाफरला बदली यष्टीरक्षक अंबाती रायुडूकरवी झेलबाद केले. वृद्धिमान साहाच्या बरगडय़ांना चेंडू लागल्यामुळे तो गुरुवारी मैदानावर उतरू न शकल्याने रायुडूने यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडली.
रणजी हंगामात सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या जाफरने ११ चौकार आणि एका षटकारासह ८० धावा फटकावत संघाला चांगली सुरुवात करून दिली. जाफर-अजिंक्यने दुसऱ्या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी रचली. अजिंक्यने सावध, पण दर्जेदार फलंदाजी करत ८ चौकारांच्या मदतीने नाबाद ५५ धावा फटकावल्या असून इराणी सामन्यातील तिसरे शतक झळकावून भारतीय संघातील आपले स्थान कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
 अंकित चव्हाण कामगिरीबाबत समाधानी
मुंबई : ‘‘शेष भारत संघाच्या मिळालेल्या बळींमुळे मी स्वत:च्या कामगिरीबाबत समाधानी आहे. दिवसेंदिवस खेळपट्टी अधिक संथ होत चालली आहे. त्यामुळे ती फिरकी गोलंदाजांना अधिकाधिक साथ देऊ लागेल,’’ असे मुंबईचा डावखुरा फिरकी गोलंदाज अंकित चव्हाणने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘झहीर खान आणि अजित आगरकर या वेगवान गोलंदाजांची उणीव आम्हाला जाणवली. शेष भारताच्या धावसंख्येचे आव्हान मोठे आहे. आणखी धावा आम्हाला करायच्या आहेत. आमच्याकडे दिग्गज फलंदाज आहेत. त्यामुळे हे आव्हान पेलणे आम्हाला कठीण जाणार नाही.’’
कसोटी क्रिकेटसाठी सज्ज होण्याचे सुरेश रैनाचे ध्येय
मुंबई : ‘‘अभिमन्यू मिथुनसोबत उभारलेली दीडशतकी भागीदारी माझ्यासाठी महत्त्वाची ठरली. आमच्या दोघांचा मैदानावरील समन्वय अतिशय चांगला होता. परंतु फक्त शतक झळकावणे हे माझे उद्दिष्ट नव्हते, तर कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने सज्ज होण्यासाठी १५०-१६० धावा उभारण्याचे ध्येय मी निश्चित केले होते,’’ असे शेष भारताचा शतकवीर फलंदाज सुरेश रैनाने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरल्यावर तळाच्या फलंदाजांना सोबतीला घेऊन धावा कशा काढायच्या, हे तंत्र मला ज्ञात आहे. मुंबईतील शतक हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. गेले काही दिवस एअर इंडियाचे प्रतिनिधित्व करताना स्थानिक स्पर्धासाठी मुंबईत खेळण्याचा चांगला अनुभव मला मिळाला आहे. धावांचा प्रवाह असाच कायम राखण्याचा माझा प्रयत्न असेल. झहीर खान आणि अजित आगरकरच्या अनुपस्थितीत धवल कुलकर्णी हा वेगवान गोलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळत आहे. जावेद खानसुद्धा चांगला मारा करत आहे,’’ असे रैना म्हणाला.

संक्षिप्त धावफलक
शेष भारत (पहिला डाव): १३०.१ षटकांत सर्व बाद ५२६ (मुरली विजय ११६, शिखर धवन ६३, अंबाती रायुडू ५१, सुरेश रैना १३४, अभिमन्यू मिथुन ५१; अंकित चव्हाण ३/५६)
मुंबई (पहिला डाव) : ४३ षटकांत २ बाद १५५ (वासिम जाफर ८०, अजिंक्य रहाणे खेळत आहे ५५; एस. श्रीशांत १/३३).