श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका भारताने ३-० अशी जिंकली. या मालिकेत लोकेश राहुलला पहिल्या कसोटीत दुखापतीमुळे खेळता आलं नव्हतं. मात्र नंतरच्या सामन्यांमध्ये त्याने उल्लेखनीय खेळ करत आपण फॉर्मात आल्याचं दाखवून दिलं. दुखापतींवर मात करत लोकेश राहुलची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली होती. मात्र तिसरी कसोटी जिंकल्यानंतर लोकेश राहुलने BCCI.TV ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या दुखापतीसाठी चेतेश्वर पुजाराला जबाबधार धरलं.

ही मुलाखत केवळ गमतीचा भाग म्हणून चित्रीत करण्यात आली होती. चेतेश्वर पुजाराने घेतलेल्या मुलाखतीत लोकेश राहुलला जेव्हा त्याच्या दुखापतींबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता, राहुलने गमती-गमतीत पुजाराला आपल्या दुखापतीसाठी जबाबदार धरलं.

” कृपा कर आणि मला माझ्या दुखापतीबद्दल विचारु नकोस पुजारा. तुला माहितीये मला एनसीएत जाण्याचा किती कंटाळा आहे. सरावासाठी मी एनसीएमध्ये जातो, मात्र दुखापतीतून सावरण्यासाठी एनसीएमध्ये ( नॅशनल क्रिकेट अकादमी) जाणं हे वेदनादायी असतं. माझ्यामते या दुखापतीसाठी सर्वस्वी तू जबाबदार आहेस. कारण सध्या शॉर्ट लेगच्या जागेवर क्षेत्ररक्षणासाठी तू उभा राहत नाहीस. त्यामुळे आमच्यासारख्या नवोदीतांवर अन्याय होतो”, असं म्हणत लोकेश राहुलने पुजाराची खिल्ली उडवली.

येत्या रविवारपासून भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात वन-डे मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता या मालिकेत भारताचा संघ कशी कामगिरी करतो, आणि श्रीलंका भारताला कसं आव्हान देते हे पहावं लागणार आहे.