भारतीय क्रिकेट क्षेत्रातील सुधारणांबाबत लोढा समितीने सुचविलेल्या शिफारसीनुसार सट्टेबाजीस कायदेशीर मान्यता दिली पाहिजे, असे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी सांगितले. ‘आयडिया एक्सचेंज’ कार्यक्रमांतर्गत शिर्के यांच्याशी वार्तालाप करण्यात आला. त्या वेळी शिर्के यांनी सांगितले की, ‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणतीही क्रिकेट संघटना सट्टेबाजी रोखू शकलेली नाही. अनेक देशांमध्ये सट्टेबाजीला कायद्यानेच मान्यता देण्यात आली आहे. आपल्या देशातही त्याचेच अनुकरण करण्याची गरज आहे. मॅचफिक्सिंगसारख्या घटना रोखणे कोणतीही क्रिकेट संघटना थोपवू शकत नाही. त्याकरिता शासननियुक्त भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे स्वतंत्र जबाबदारी सोपविण्याची आवश्यकता आहे. तसेच प्रत्येक संघटनेमध्ये आर्थिक शिस्त व पारदर्शी कारभार आवश्यक आहे.’’ लोढा समितीबाबत विचारले असता शिर्के म्हणाले की, ‘‘या समितीने दिलेल्या शिफारसींमध्ये खूपच त्रुटी आहेत. या समितीने निवड समितीमध्ये केवळ तीनच सदस्य असावेत, अशी शिफारस केली आहे. मात्र आपल्या देशात होणाऱ्या हजारो सामन्यांचा विचार करता तीन सदस्यांची निवड समिती व्यवस्थितरीत्या कामच करू शकणार नाही. या समितीने एक राज्य एक संघटना अशी शिफारस केली आहे. मात्र देशातील अनेक क्रिकेट संघटना स्वातंत्र्यापूर्वीपासून कार्यरत आहेत. त्यामुळे अशा संस्थांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे व अनेक होतकरू खेळाडूंच्या प्रगतीमध्ये अडसर निर्माण होण्याची शक्यता आहे. ही शिफारस अतिशय अयोग्य आहे.’’ खेळाडूंकडेच संघटनेचा कारभार देण्याच्या सूचनेबाबत शिर्के म्हणाले की, ‘‘खेळाडूंनी संघटना चालविण्याचा प्रयोग यापूर्वी काही राज्यांमध्ये फसला आहे. कोणतीही संघटना चालविणे हे केवळ एका व्यक्तीचे काम नसते. त्याकरिता सांघिक समन्वय आवश्यक असतो. आजकाल संघटना चालविण्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोन अपरिहार्य आहे. वेगवेगळ्या समित्यांद्वारे संघटनेचे कामकाज चालते व या समित्यांवर अनुभवी व्यक्तीच असतात.’’ ‘‘गहुंजे येथे यंदा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२०, आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्याद्वारे संघटनेची आर्थिक स्थिती सावरण्यास मदत होणार आहे. रणजी सामना व कसोटी सामन्याद्वारे फारसे उत्पन्न मिळणार नाही. तसेच सहारा समूहाबरोबर सुरू असलेली न्यायालयीन लढाई लवकरच संपुष्टात येईल, त्यामुळेही संघटनेची स्थिती चांगली होईल,’’ असेही शिर्के यांनी सांगितले. ‘‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ही आपल्या देशातील सर्वोत्तम कारभार करणारी क्रीडा संघटना आहे. मंडळाची प्रतिमा काही खेळाडूंनी केलेल्या मॅचफिक्सिंगमुळे मलिन झाली. त्यामध्ये मंडळाचा काहीही दोष नाही. कोणत्याही खेळाडूला त्याच्या वैयक्तिक जीवनात मंडळ रोखू शकत नाही. आयपीएल व आंतरराष्ट्रीय सामन्यांद्वारे दरवर्षी कोटय़वधी उत्पन्न मिळूनही खेळाडू मॅचफिक्सिंगबाबत एखाद्या सट्टेबाजाला भेटत असतील, तर मंडळ त्यामध्ये काही करू शकत नाही. मंडळाचा कारभार अतिशय सचोटीनेच चालला आहे,’’ असे शिर्के यांनी सांगितले.