cricket-blog-ravi-patki

टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ आत्ताच जाहीर झाला. मायदेशात स्पर्धा असल्याने भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करणे चूक नाही. एकतर परिचित खेळपट्टया आणि उन्हाळा सुरु होताना होत असलेली स्पर्धेची सुरुवात. त्यामुळे रणरणत्या उन्हाने कोरड्या झालेल्या खेळपट्टया भारतीय स्पिनर्संना उपयुक्त ठरतील. आजकालच्या क्रिकेटमध्ये डावखुरे स्पिनर्स आणि ऑफ स्पिनर्स चांगलाच दरारा निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. जडेजा आणि नेगी या दोन डावखुरया स्पिनर्समुळे भारत मोक्याच्या वेळेस विकेट काढू शकेल. डावखुरया स्पिनर्संना स्पिनविरुद्ध मारणे आजकालच्या फलंदाजाना जमत नाही. विथ द स्पिनसुद्धा मोजक्याच फलंदाजाना जमते. जडेजा आणि नेगीने दिवाळी करून घेतल्यास आश्चर्य वाटायला नको. संघात किती डावखुरे आणि किती उजव्या हाताचे फलंदाज आहेत त्यावर किती लेफ्ट आर्म स्पिनर्स आणि किती ऑफस्पिनर्स घ्यायचे हे धोनी ठरवू शकतो. अश्विन, हरभजन, जडेजा, नेगी हे चार स्पेशलिस्ट स्पिनर्स निवडले जातात म्हणजेच भारतीय खेळपट्टीवर स्पिन हाच हुकमी एक्का आहे हा विचार धोनीच्या मनात पक्का आहे हे दिसून येते. एखाद्या सामन्यात या चारपैकी तीन स्पिनर्स एकत्र खेळले तरी आश्चर्य वाटायला नको.
फास्ट बॉलिंगमध्ये नेहरा आणि शमी वर्ल्डकप संपेपर्यंत एकसंध शरीरयष्टी टिकवून राहिले तर बरे होईल. शमी तर आतापर्यंत त्याची बॉलिंग अॅक्शन विसरली असण्याची भीती वाटतीये. २०१५च्या वर्ल्डकप सेमी फाइनल नंतर कधीही विचारलं शमी कुठे आहे तर ‘वो जरा आराम फरमा रहें हैं’ अस उत्तर मिळालं. धर्मशाला आणि मोहालीला पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामने असल्याने फास्ट बॉलर्स तयार लागणार.
पहिल्या सहा षटकांत ‘हिलाके रख दे’ अशी फलंदाजी रोहित, धवन, कोहलीकडून व्हावी. म्हणजे प्रतिस्पर्धी गळफटून जातो. फलंदाजी कागदावर जोरदार आहे. पण इस्पिकचे एक्के ठरणार आपले चार स्पिनर्स. लेट द शो बिगिन. ब्रिंग देम ऑन. गेम ऑन…
– रवि पत्की
sachoten@hotmail.com