मेलबर्न कसोटीचा चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाकडे ३२६ धावांची भक्कम आघाडी आहे. त्यामुळे मंगळवारी सामन्याच्या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे उर्वरित तीन फलंदाज आक्रमक पवित्रा धारण करून भारतासमोर अवघड लक्ष्य उभारु पाहतील. भारत सध्या पिछाडीवर असला तरी संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये सकारात्मक वातारवण आहे, असे भारताचा फिरकी पटू आर.अश्विनने म्हटले आहे.
अश्विन म्हणाला की, कसोटीच्या शेवटच्या दिवशी धावसंख्येचा पाठलाग करणे कठीण जरी असले तरी, संघ यासाठी पूर्णपणे तयार आहे. उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आम्ही सकारात्मक निकालाच्याच विचारात आहोत. ऑस्ट्रेलियाचे उर्वरित फलंदाज सुरूवातीलाच लवकर बाद करण्यात आम्हाला यशही मिळू शकते किंवा ते भारतासमोर आणखी चांगली धावसंख्या उभारू शकतात. काय होईल ते आत्ताच सांगणे कठीण आहे. हा कसोटी सामना आहे. येथे तुमच्या निर्णयांची आणि खेळीची खरोखरंच कसोटी लागते, असेही तो पुढे म्हणाला.