भारताच्या चेतेश्वर पुजाराने १९० चेंडूत १४ चौकारांच्या सहाय्याने आज (शुक्रवार) मोटेरा येथील सरदार वल्लबभाई स्टेडियमवर इंग्लंडविरुध्द कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दमदार शतक ठोकलं. कसोटी कारकीर्दीतील पुजाराचं हे दुसरं शतक आहे. त्याबरोबरच कॅन्सरवर मात करून पहिल्यांदाच कसोटी सामना खेळणा-या युवराजनेही शानदार अर्धशतक ठोकून आपल्या खिलाडू वृत्तीची पुन्हा एकदा चमक दाखवून दिली. युवराज सिंगने ५ चौकार आणि १ षटकाराच्या सहाय्याने ९८ चेंडूत आपलं अर्थशतक साजरं केलं. कसोटी क्रिकेटमधील युवराजचं हे अकरावं अर्धशतक आहे. भारताच्या ५ बाद ४३९ धावा झाल्या आहेत. चेतेश्वर आणि युवराजने पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. चेतेश्वर पुजारा १५६ आणि महेंद्रसिंग धोनी ४ धावांवर खेळत असून भारत मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.