केंद्रीय माहिती आयोगाचा पंतप्रधान कार्यालय आणि क्रीडा मंत्रालयाला सवाल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) बोधचिन्ह अजूनही ब्रिटिशकालीन का? असा सवाल केंद्रीय माहिती आयोगाने पंतप्रधान कार्यालय तसेच क्रीडा आणि विधी मंत्रालयाला विचारला आहे. बीसीसीआयच्या बोधचिन्हामध्ये एक स्टार आहे, त्यावर केंद्रीय माहिती आयोगाने आक्षेप घेतला आहे. ‘‘१८५७ साली भारतामध्ये स्वातंत्र्यासाठी पहिले युद्ध झाले होते. त्यावेळी आपल्याशी प्रामाणिक राहिलेल्या राजांना ब्रिटिशांनी काही मुकुट दिले होते. त्या मुकुटांवर जे चिन्ह होते, तेच बीसीसीआयच्या बोधचिन्हामध्येही दिसत आहे. आतापर्यंत बोधचिन्हामध्ये तोच आकार का ठेवण्यात आला. या बोधचिन्हामध्ये तिरंगा किंवा अशोक चक्राचा वापर करता आला असता, पण तो का केला गेला नाही,’’ असे प्रश्न केंद्रीय आयोगाने विचारले आहेत. याबरोबरच केंद्र सरकारने बीसीसीआयला माहिती अधिकाराच्या कक्षात का आणले नाही, असा सवालही विचारला आहे. केंद्रीय माहिती आयोगाने यासहित काही प्रश्नांची पंतप्रधान कार्यालय आणि क्रीडा खात्याकडून उत्तरे मागवली आहेत. यामध्ये बीसीसीआयचे बोधचिन्ह, माहिती अधिकार यांच्यासहित काही प्रश्न विचारले गेले आहेत. सामना निश्चिती किंवा सट्टेबाजीवर अजूनपर्यंत आळा का घातला जात नाही, त्याचबरोबर दोषींवर आतापर्यंत कडक कारवाई का केली गेली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय मिळवलेल्या खेळाडूंचा सन्मान का केला जात नाही? या प्रश्नांचा समावेश आहे. केंद्रीय माहिती आयोगाने आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी पंतप्रधान कार्यालय आणि क्रीडा खात्याला ३० दिवसांची मुदत दिली आहे.