* ईडन गार्डन कसोटी सामन्यात सात गडी राखून इंग्लंड विजयी
* कसोटी मालिकेत २-१ ने इंग्लंड आघाडीवर
भारत-इंग्लंड दरम्यानच्या तिस-या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव २४७ धावांवर संपुष्टात आला व इंग्लंडसमोर विजयासाठी ४१ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. दरम्यान, इंग्लंडची खराब सुरूवात झाली व पहिले तीन फलंदाज केवळ आठ धावांवर बाद झाले होते. पण सरतेशेवटी सामन्यात इंग्लंडचे पारडे जड असल्याने इंग्लंडने भारतावर ७ गडी राखून विजय मिळवला आणि कसोटी मालिकेत २-१ ने आघाडी प्राप्त केली आहे.

दुस-या डावात इंग्लंडची फलंदाजी-
कप्तान अँलिस्टर कुक (१), जाँन्थन ट्रोट(३) आणि केवीन पीटरसन(०) हे तीन फलंदाज स्वस्तात बाद झाले व आयन बेल(नाबाद २८)ने उत्तम खेळी करत इंग्लंडला ईडन गार्डनवरील कसोटी सामन्यात विजय मिळवून दिला. आता चौथ्या व शेवटच्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघ १३ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये मैदानात उतरणार आहेत. कसोटी मालिकेत इंग्लंडशी बरोबरी राखण्यासाठी भारतासमोर हा सामना जिंकण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, तर इंग्लंडने नुसता हा सामना अनिर्णयीत जरी राखला तरी इंग्लंड भारताविरूद्ध ऐतिहासिक विजय प्राप्त करेल त्यामुळे आपल्याच मैदानावर पराजीत होण्यापासून रोखण्यासाठी भारतीय संघाला चौथा कसोटी सामना जिंकावाच लागेल.