भारताच्या शेवटच्या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा शुक्रवारी अंत पाहिला. त्याच भागीदारीतून प्रेरणा घेत इंग्लंडचा मधल्या फळीतील खेळाडू जो रूटने अकराव्या क्रमाकांवर फलंदाजीला आलेल्या जेम्स अँडरसनला हाताशी घेत विश्वविक्रमी भागीदारी रचली आणि इंग्लंडला संकटातून बाहेर काढले.
एकाक्षणी फॉलोऑनचे संकट समोर उभे ठाकलेल्या इंग्लंडच्या संघाने आघाडीसह आगेकूच केली. जो रूटने शतक तर जेम्स अँडरसनने कारकिर्दीतील पहिले अर्धशतक साजरे केले. या जोडीने १९८ धावांची भागीदारी करत शेवटच्या विकेटसाठीचा १६३ धावांचा विक्रम मोडला. उपहारानंतर इंग्लंडचा पहिला डाव ४९६ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय संघाने दुसऱ्या डावात ३ बाद १६७ अशी मजल मारली आहे. त्यामुळे भारताकडे १२८ धावांची आघाडी आहे.
९ बाद २९८ अशा स्थितीतून इंग्लंडला रूट-अँडरसन जोडीने शुक्रवारी इंग्लंडला सावरले. त्यानंतर शनिवारी ३५२ धावसंख्येवरून पुढे खेळ सुरू केल्यावरही या जोडीने भारतीय गोलंदाजांना झगडायला लावले. रूटने १५ चौकारांसह २९५ चेंडूंत १५४ धावांची खेळी केली, तर अँडरसनने १७ चौकारांसह १३० चेंडूंत ८१ धावांची खेळी साकारली. भारतातर्फे भुवनेश्वर कुमारने ८२ धावांत ५ बळी घेतले. विश्वविक्रमी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने ३९ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी अर्धशतकी खेळी करत डाव सावरला. मात्र पुजारा ५५ तर विजय ५२ धावांवर बाद झाल्याने भारतीय संघाची उत्तरार्धात ३ बाद १६७ अशी अवस्था झाली आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : ४५७
इंग्लंड (पहिला डाव) : सर्व बाद ४९६ (जो रूट नाबाद १५४, जेम्स अँडरसन ८१, गॅरी बॅलन्स ७१, सॅम रॉबसन ५९; भुवनेश्वर कुमार ५/८२)
भारत (दुसरा डाव) : ३ बाद ४८ (चेतेश्वर पुजारा ५५, मुरली विजय ५२, शिखर धवन २९; मोइन अली २/२९)