आयपीएल हे युवा खेळाडूंसाठी आपल्यातील कौशल्य सिद्ध करण्यासाठीचं खूप मोठं व्यासपीठ ठरतं. देशात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या या टी-२० स्पर्धेतून आपल्याला भारतीय संघात आजवर अनेक युवा खेळाडू दिले आहेत. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मनिष पांडे ही याचीच उदाहरणं आहेत. यंदाच्या आयपीएलमध्येही पाच युवा खेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या खेळात अद्याप सुधारणेची गरज असली तरी संधी दिल्यास ते संधीचं सोनं करण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे यांच्याकडे भारतीय संघाचं भविष्य म्हणून पाहू जाऊ लागलं आहे. १. इशान किशन- १९ वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेत इशात किशनने भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते. इशानच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. झारखंडच्या या यष्टीरक्षक फलंदाजाने आपल्यातील गुणवैशिष्ट्ये आयपीएलमध्ये दाखवून दिली. २. ऋषभ पंत- ऋषभ पंतने यंदाच्या आयपीएलमध्ये पदार्पणातच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. खरंतर ऋषभने रणजी सामन्यांमध्येच आपल्यातील चमक दाखवून दिली होती. पण आयपीएलमध्ये तो अधिक नावारुपाला आला. रणजीमध्ये त्रिशतकी कामगिरी करणारा तो भारताचा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला होता. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही त्याने चांगली कामगिरी केली. आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळताना यष्टीरक्षणासोबतच फलंदाजीतही त्याने नाव कमवलं. गुजरात लायन्सविरुद्ध ऋषभने साकारलेली ९७ धावांची तुफान खेळी अविस्मरणीय ठरली. सचिन तेंडुलकरसारख्या इतर अनेक क्रिकेट दिग्गजांनी ऋषभची दखल घेत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. ३. राहुल त्रिपाठी- मयांक अग्रवाल अपयशी ठरत असताना रायझिंग पुणे सुपरजायंटकडून राहुल त्रिपाठी याला संधी देण्यात आली. राहुलने मिळालेल्या संधीचे सोनं केलं. अजिंक्य रहाणेसोबत सलामीसाठी फलंदाजी करून त्रिपाठीने आपली ओळख निर्माण केली. त्रिपाठीचे सरळ बॅटचे फटके पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धची राहुल त्रिपाठीची ९३ धावांची खेळी अविस्मरणीय ठरली. ४. संजू सॅमसन- संजू सॅमसनने आपल्या कौशल्य वेळोवेळी सिद्ध करून दाखवलं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये शतकी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला. आयपीएलमधील त्याच्या लक्षवेधी कामगिरीने तो नक्कीच पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सॅमसनकडे भारतीय संघाचं भविष्य म्हणून पाहिलं जातं. ५. श्रेयस अय्यर- यंदाच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवेली श्रेयस अय्यरकडे विराट कोहलीचा पर्याय म्हणून पाहिलं जात होतं. कोहली दुखापतग्रस्त असताना श्रेयर अय्यरला नाव पुढे आलं होतं. यातूनच श्रेयस अय्यर निवड समितीच्या रडारवर असल्याचं कळून आलं. त्यामुळे श्रेयस येत्या काही कालावधीत नक्कीच भारतीय संघात खेळाताना पाहायला दिसेल अशी दाट शक्यता आहे. आयपीएलमध्ये श्रेयसने सर्वाधिक ९६ धावांची खेळी साकारली होती.