बांगलादेशविरुद्धच्या सलग दुसऱया एकदिवसीय सामन्यात पराभव झाल्यानंतर टीकेचा धनी झालेल्या कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने कर्णधारपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. जर कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने भारतीय क्रिकेटचे भले होणार असेल, तर मी लगेच राजीनामा द्यायला तयार आहे, असे धोनी याने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परीषदेत सांगितले.
सलग दुसऱया पराभवाने बांगलादेशमधील एकदिवसीय मालिका भारताने गमावली. रविवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशने सहा विकेट्सनी भारतावर विजय मिळवला. यानंतर पत्रकार परिषदेत धोनी म्हणाला, भारतीय क्रिकेटमध्ये जे काही वाईट घडते, त्याला कायम मीच जबाबदार असतो. सर्वकाही माझ्यामुळेच घडते. बांगलादेशमधील माध्यमांनाही असेच वाटते आहे. वास्तविक मी माझ्या खेळाचा आनंद घेतो आहे. माध्यमे कायम मला असे प्रश्न विचारत असतात. पण जर माझ्या पायउतार होण्याने भारतीय क्रिकेटचे भले होणार असेल, तर मला राजीनामा देऊन पायउतार व्हायला नक्कीच आवडेल, असे त्याने म्हटले आहे.