अक्षत रेड्डी आणि हनुमा बिहारी या दोघांच्या तडफदार खेळींच्या जोरावर हैदराबादच्या संघाने मुंबईविरुद्धच्या रणजी सामन्यात आघाडीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. रेड्डी-विहारी जोडीने मुंबईच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला आणि त्या जोरावरच हैदराबादला दिवसअखेर ३ बाद ४२३ अशी मजल मारता आली. पहिल्या डावात आघाडी मिळवण्याची हैदराबादला अजून २१ धावांची गरज असून त्यांचे सात फलंदाज शिल्लक आहेत.
 रेड्डी-विहारी जोडीने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. पहिल्या दोन्ही सत्रांत हे दोघेही मुंबईच्या गोलंदाजांवर तुटून पडले. दिवस संपण्यासाठी अवघी पाच षटके शिल्लक असताना हे दोघेही ठरावीक फरकाने बाद झाले, पण बाद होण्यापूर्वी या दोघांनीही हैदराबादला मुंबईच्या धावसंख्येच्या समीप नेऊन पोहोचवले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ३८६ धावांची भागीदारी रचली. रेड्डीने यावेळी २७ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १९६ धावांची खेळी साकारली, तर विहारीने १८ चौकारांच्या मदतीने १९१ धावांची खेळी साकारत या भागीदारीत मोलाची भूमिका बजावली. मंगळवारी मुंबईवर आघाडी मिळवून तीन गुणांची कमाई करण्याचा हैदराबादचा प्रयत्न असेल.