भारतीय पुरुष संघाने ढाका येथे बांगलादेशविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ५-१ अशी मात करीत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
सामन्याची सुरुवात बांगलादेशच्या गोलने झाली. त्यांचा हा गोल सातव्या मिनिटाला हसन झुबेर याने केला. मात्र त्यानंतर हरजितसिंग याने भारताचा पहिला गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. पाठोपाठ भारताच्या युवराज वाल्मीकी (१२वे मिनिट), एस.के.उथप्पा (२०वे मिनिट), देवेंद्र वाल्मीकी (२४वे मिनिट) यांनी गोल करीत पूर्वार्धात ४-१ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात अफान युसुफने ४१व्या मिनिटाला भारताचा पाचवा गोल नोंदविला. देवेंद्र वाल्मीकी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या मालिकेतील तिसरा सामना शनिवारी होणार आहे.