दुसऱ्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेवर भारताने आतापर्यंत वर्चस्व गाजवले असून रविवारी गतविजेत्या भारताने तिसऱ्या लढतीत ओमानचा ११-० असा धुव्वा उडवला. भारतातर्फे एस. व्ही. सुनील (तिसऱ्या आणि ४४व्या मिनिटाला), धरमवीर सिंग (आठव्या आणि ५६व्या मिनिटाला), व्ही. आर. रघुनाथ (३०व्या आणि ३८व्या मिनिटाला), रुपिंदर पाल सिंग (३३व्या आणि ४३व्या मिनिटाला), आकाशदीप सिंग (५३व्या मिनिटाला), हरबीर सिंग (६५व्या मिनिटाला) आणि दानिश मुज्तबा (६७व्या मिनिटाला) यांनी गोल केले. आता सोमवारी होणाऱ्या चौथ्या लढतीत भारताला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करावे लागतील. याआधीच्या सामन्यात भारताने चीनवर ४-०ने तर जपानवर ३-१ने विजय मिळवला होता.