ग्रेट ब्रिटनकडून हार पत्करल्यानंतर गतविजेत्या भारताने मुसंडी मारत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ६-० असा विजय मिळवला. तमन दया स्टेडियमवरील सुल्तान ऑफ जोहोर चषक हॉकी स्पध्रेतील (२१ वर्षांखालील) हा भारताचा तिसरा सामना होता.
पहिली १५ मिनिटे अटितटीच्या झुंजीनंतर हरजीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारताच्या कनिष्ठ संघाने मैदानावर वर्चस्व प्रस्थापित केले. २२व्या मिनिटाला आघाडीपटू इम्रान खानने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करून संघाचे खाते उघडले. मग ३४व्या मिनिटाला परविंदर सिंगने भारताच्या खात्यावर दुसरा गोल जमा केला. त्यानंतर अरमान कुरेशीने ४९व्या मिनिटाला तिसरा मैदानी गोल झळकावला. मग चारच मिनिटांनी हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले. ६७व्या मिनिटाला वरुण कुमारने आणखी एक गोल पेनल्टी कॉर्नरद्वारे साकारला. त्यानंतर अरमानने भारताचा सहावा आणि वैयक्तिक दुसरा गोल पेनल्टी गोलद्वारे झळकावला.
याबाबत भारताचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग म्हणाले, ‘‘भारताने अप्रतिम विजय मिळवला, परंतु तरीही अनेक भागांमध्ये सुधारण्याची आवश्यकता आहे. आम्ही रचलेल्या व्यूहरचना खेळाडूंनी प्रत्यक्षात अंमलात आणल्या. त्यामुळे मी विजयाचे श्रेय खेळाडूंनाच देईल. भारतीय संघाची कामगिरी अधिक परिपक्व होत आहे.
सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडला हरवणाऱ्या भारताची शुक्रवारी यजमान मलेशियाशी गाठ पडणर आहे. अन्य एका लढतीत तीन गोलनी पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियाने आश्चर्याचा धक्का देत ४-३ अशा फरकाने न्यूझीलंडला धूळ चारली.