आगामी वर्षांमध्ये होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकपूर्वी भारतीय हॉकी संघाने अव्वल संघांविरुद्ध खडतर परीक्षा द्यावी, अशी अपेक्षा गोलरक्षक पीआर श्रीजेशने व्यक्त केली आहे.
संपूर्ण संघाला अर्जुन पुरस्कार समर्पित केल्यानंतर श्रीजेश म्हणाला की, ‘‘हा फक्त माझ्या एकटय़ाचा पुरस्कार नाही तर संपूर्ण संघाचा आहे. हॉकी हा एक सांघिक खेळ आहे आणि कोणताही एकटा खेळाडू संघाला पदक जिंकवून देऊ शकत नाही. हा फार मोठा सन्मान आहे आणि या पुरस्काराने जबाबदारीही वाढली आहे. या पुरस्काराने आगामी स्पर्धामध्ये खेळताना अधिक प्रोत्साहन मिळेल.’’
तो पुढे म्हणाला की, ‘‘सध्या भारतीय संघ जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असला तरी कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता या संघामध्ये आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या संघांनाही आम्ही पराभूत केले आहे, पण आम्हाला ऑलिम्पिकपूर्वी अधिक अनुभव मिळायला हवा. ऑलिम्पिकपूर्वी जर आम्हाला अधिक खडतर सामने खेळायला मिळाले तर त्याचा नक्कीच फायदा होईल.’’