आगामी आशिया चषक हॉकी स्पर्धेआधीच भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने आपला पराभव मान्य केला की काय असं वाटायला लागलं आहे. पाकिस्तान हॉकी संघाचे प्रशिक्षक फराहत खान यांनी भारत हा स्पर्धेतला सर्वात भक्कम संघ असल्याचं म्हणलं आहे. ऑक्टोबर महिन्यात बांगलादेशची राजधानी ढाका येथे ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. ‘अ’ गटात समावेश करण्यात आलेल्या पाकिस्तानला यंदा भारत, जपान आणि यजमान बांगलादेशचा सामना करायचा आहे.

भारताव्यतिरीक्त इतर देशांच्या कामगिरीवरही आमचं लक्ष आहे. वर्ल्ड हॉकीलीग स्पर्धेत मलेशियाच्या संघाने अनपेक्षित कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला होता. त्यामुळे आमची कामगिरी सुधरवण्यासोबत, इतर संघांच्या कामगिरीकडे लक्ष ठेवणं हे देखील आमच्यासाठी महत्वाचं असल्याचं, फराहत यांनी म्हणलं आहे.

सध्या पाकिस्तान हॉकी संघाला सर्वच बाबतीत सुधारणांची गरज आहे. गेले काही महिने पाकिस्तान हॉकीसाठी कठीण गेले आहेत. त्यामुळे आगामी विश्वचषक आणि ऑलिम्पीकचा विचार केला असता, आशिया चषकात आमची कामगिरीत सुधारणा करणं अत्यंत गरजेचं असल्याचं पाकिस्तानी प्रशिक्षकांनी म्हणलं आहे. वर्ल्ड हॉकीलीग स्पर्धेत पाकिस्तानला भारताकडून दोनवेळा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. २०१८ साली भारतात होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ पात्र ठरलाय, त्यामुळे आगामी काळात पाकिस्तानचा संघ हॉकीत कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असेल.