कसोटी मालिकेतील दारुण पराभवामुळे भारतीय क्रिकेट संघावर आभाळच कोसळले होते. संघातील दिग्गज खेळाडूंची सुमार फलंदाजी, अनुकूल खेळपट्टय़ांवर झगडणारी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या सर्वच गोष्टींवर टीकेचा भडिमार झाला. पण कसोटी क्रिकेटमधून ट्वेन्टी-२० या वेगवान प्रकारात आल्यावर मात्र भारताचे नशीब पालटले. गुरुवारी गहुंजेच्या सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर इंग्लिश संघावर ५ विकेट राखून आरामात विजय मिळविल्यानंतर ‘विजयाची ही घडी अशीच राहू दे..’ ही आशा सामनावीर युवराज सिंगने प्रकट केली. आता शनिवारी वानखेडे स्टेडियमवर होणारी दुसरी आणि अखेरची ट्वेन्टी-२० लढत जिंकून मालिकेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. तथापि, भारतीय भूमीवर कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय संपादन केल्यानंतर आता ट्वेन्टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधून इंग्लंडला नाताळ साजरा करण्यासाठी समाधानाने जाण्याचे इंग्लिश संघाचे मनसुबे आहेत.
अहमदाबादच्या पहिल्या कसोटीत अपयशी ठरल्यानंतर भारतीय खेळपट्टय़ांवरील फिरकी महात्म्य इंग्लंड क्रिकेट संघाला चांगलेच कळून चुकले. मग ग्रॅमी स्वान आणि माँटी पनेसार या हुकमी फिरकी माऱ्यासहित इंग्लिश संघाने मुंबई आणि कोलकात्याचे गड सर करीत मालिकेवर वर्चस्व निर्माण केले. त्यानंतर नागपूरची कसोटीही भारताला जिंकू न देण्याची काळजी इंग्लंडने घेतली. कसोटी क्रिकेटच्या अपयशानंतर ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या रणांगणावर भारताची पहिली ‘कसोटी’ तरी युवराज सिंगचा ‘सहारा’ मिळाल्याने भारताने सहजगत्या जिंकली.
सात गोलंदाज वापरूनही भारताला इंग्लंडची दुसरी जोडी फोडता येत नव्हती. अ‍ॅलेक्स हेल्स आणि ल्युक राइट यांची जमलेली जोडी तब्बल ११व्या षटकात युवराजने फोडली. युवीने १९ धावांत ३ बळी घेतले आणि त्यानंतर फलंदाजीतही कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या ३८ धावा काढून भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. पण इंग्लिश संघाने ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्येही भारताला कडवा प्रतिकार करण्याच्या उद्देशाने डावखुरा डॅनी ब्रिग्स, ऑफ-स्पिनर जेम्स ट्रेडवेल आणि कामचलाऊ समित पटेल असा फिरकी मारा दिमतीला ठेवला होता.
आर. अश्विनने मायकेल लुम्बच्या रुपाने गुरुवारी भारताला पहिले यश मिळवून दिले, पण त्याव्यतिरिक्त त्याच्या ४ षटकांत इंग्लिश फलंदाजांनी ३३ धावा काढल्या. नवखा वेगवान गोलंदाज परविंदर अवाना, पियूष चावला, रवींद्र जडेजा आणि विराट कोहली यांनाही इंग्लिश फलंदाजांनी चांगलाच चोप दिला. अशोक दिंडाने मात्र टिच्चून गोलंदाजी करीत ३ षटकांत १८ धावांत २ बळी घेतले. फलंदाजीच्या प्रांतात गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणेने ४२ धावांच्या सलामीचा पाया रचून दिल्यानंतर विराट कोहली (२१), युवराज सिंग, सुरेश रैना (२६) आणि महेंद्रसिंग धोनी (नाबाद २४) यांनी आपल्या जबाबदाऱ्या चोख पार पाडल्या.
इंग्लिश संघाचे आक्रमण मात्र राइट आणि हेल्स तंबूत परतल्यानंतर थंडावले. जोस बटलरने ३ षटकारांसह ३३ धावा काढत समित पटेलसोबत चांगली जोडी जमवली. गोलंदाजीत टिम ब्रेस्नन वगळता अन्य कोणत्याही गोलंदाजाला आपला प्रभाव पाडता आला नाही.
ज्या वानखेडेवर इंग्लिश संघाने आपला भारत दौऱ्यावरील पहिला विजय नोंदवला, त्याच मैदानावर आता पुन्हा हे दोन प्रतिस्पर्धी आमने-सामने येणार आहेत. मैदान तेच, प्रतिस्पर्धी तेच.. फक्त बदलला आहे तो क्रिकेटचा प्रकार. त्यामुळे धोनीसेना रुबाबात ट्वेन्टी-२० मालिका जिंकून अपयशी कसोटी मालिकेवर मलमपट्टी करेल अशी आशा आहे. याचप्रमाणे वर्षांखेरीस भारताला पाकिस्तानशी ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत लढायचे आहे. त्यासाठीही हा विजय आत्मविश्वास उंचावणारा ठरेल, अशी तमाम क्रिकेटरसिकांना आशा आहे.
प्रतिस्पर्धी संघ-
भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), गौतम गंभीर, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, युवराज सिंग, अंबाती रायुडू, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, पीयूष चावला, अशोक दिंडा, भुवनेश्वर कुमार, अभिमन्यू मिथुन, परविंदर अवाना.
इंग्लंड : ईऑन मॉर्गन (कर्णधार), जेम्स हॅरिस, जॉनी बेअरस्टो, टिम ब्रेस्नन, अ‍ॅलेक्स हेल्स, जोस बटलर, जेड डर्नबॅच, जेम्स ट्रेडवेल, मायकेल लुम्ब, डॅनी ब्रिग्स, मायकेल लुम्ब, स्टुअर्ट मीकर, समित पटेल, जो रूट, ल्युक राइट.
सामन्याची वेळ : सायं. ७ वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, स्टार क्रिकेट.    

कौटुंबिक कारणांमुळे जॉनी बेअरस्टो मायदेशी रवाना
मुंबई : इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टोव याला कौटुंबिक कारणास्तव भारतीय दौरा पूर्ण होण्यापूर्वीच मायदेशी परतावे लागणार आहे. पुण्यातील ट्वेन्टी-२० सामन्यात बेअरस्टोच्या जागी जोस बटलरला संधी देण्यात आली होती. भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत बेअरस्टो मुंबईतील सामन्यात खेळला होता आणि त्याला या सामन्यात फक्त ९ धावाच करता आल्या होत्या. बेअरस्टोला कौटुंबिक कारणास्तव शुक्रवारी भारतीय दौरा पूर्ण होण्यापूर्वीच मायदेशी परतावे लागले आहे, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने आपल्या पत्रकात नमूद केले आहे.

ऑनलाइन तिकि टे ‘सोल्ड आऊट’
वानखेडेवरच्या पहिल्याच ट्वेन्टी-२० सामन्याला मुंबईक रांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पुण्यातील पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्याला थंड प्रतिसाद लाभल्याने दुसऱ्या सामन्याची कि ती तिकिटे विक ली जातात, याकडे साऱ्यांचेच लक्ष होते. वानखेडेवरच्या सामन्यासाठीची ऑनलाइन तिकिटे शनिवारी संध्याकोळपर्यंत पूर्णपणे विकली गेली होती. ‘मुंबईच्या सामन्याला प्रेक्षकोंचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. या वेळी ३३ हजार तिकिटे सामान्य लोकोंसाठी ठेवण्यात आली होती. त्यामधील ऑनलाइनची सर्व तिकिटे विक ली गेली आहेत. आता फक्त ८०० तिकिटे बाकी आहेत’, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील (एसमीए) सूत्रांनी सांगितले.