पाकिस्तानवर मात केल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ चीन व मलेशिया यांच्याविरुद्धही विजय मिळवित आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान पटकावण्यासाठी उत्सुक झाला आहे. भारताने जपानचा १०-२ असा धुव्वा उडविल्यानंतर पारंपरिक प्रतिस्पध्र्यी पाकिस्तानवर ३-२ अशी मात केली होती. या विजयामुळे भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य वाढले आहे. त्यांना आता मंगळवारी चीनविरुद्ध, तर बुधवारी यजमान मलेशियाविरुद्ध खेळावे लागणार आहे. गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या मलेशियाने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये नऊ गुणांची कमाई केली असून भारताने सात गुणांसह त्याखालोखाल स्थान घेतले आहे. गतविजेत्या पाकिस्तानला आतापर्यंत फक्त तीनच गुण मिळविता आले आहेत. पाकिस्तानने आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला असून उर्वरित सामन्यांमध्ये त्यांना जपान व चीन यांच्याशी खेळावे लागणार आहे. भारताला दक्षिण कोरियाविरुद्धच्या लढतीत बरोबरी स्वीकारावी लागली होती. या धक्क्य़ातून सावरत भारताने पाकिस्तानविरुद्ध महत्त्वपूर्ण विजय मिळविला होता. भारताचे प्रशिक्षक रोलँन्ट ओल्टमन्स यांनी सांगितले, ‘आम्ही पाकिस्तानला हरविले असले तरी या सामन्यातील कामगिरीबाबत मी समाधानी नाही. आमच्या खेळाडूंनी किमान दोन-तीन गोलांच्या फरकाने हा सामना जिंकला असता. या सामन्यातील उत्तरार्धात आमच्या बचाव फळीतील खेळाडूंनी खूप खराब कामगिरी केली. त्यांच्याकडून सुधारणा अपेक्षित आहे. चीनचे खेळाडू लढवय्ये आहेत. त्यांच्याविरुद्ध आम्हाला गाफील राहून चालणार नाही. काही वरिष्ठ खेळाडूंना दुखापतीमुळे या स्पर्धेत भाग घेता आलेला नाही. युवा खेळाडूंना कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली आहे. खेळाडूंनी पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करण्याच्या तंत्रात प्रगती करणे आवश्यक आहे.’ भारत -पाकिस्तान हॉकी इतिहास कचऱ्याच्या टोपलीत क्वान्टन : भारत व पाकिस्तान यांच्यातील हॉकी सामन्यांबाबत लक्षावधी चाहत्यांमध्ये उत्कंठा असली तरी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या (एफआयएच) पदाधिकाऱ्यांना त्याबाबत फारशी उत्सुकता दिसत नाही. त्यामुळेच त्यांनी उभय देशांमधील यापूर्वीच्या बऱ्याच सामन्यांच्या ऐतिहासिक माहितीला कचऱ्याची टोपली दाखवली आहे. उभय देशांमध्ये १९५६मध्ये मेलबर्न येथे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत लढत झाली होती. हा या दोन संघांमधील पहिला सामना होता. त्यानंतर आजपर्यंत सहा दशकांमध्ये १६६ सामने झाले आहेत. त्यापैकी ५४ सामने भारताने जिंकले असून, ८२ सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. ३० सामने अनिर्णीत राहिले आहेत. एफआयएचने या उभय देशांमधील सामन्यांचा इतिहास दिला आहे. त्यानुसार आजपर्यंत या दोन संघांमध्ये फक्त ४७ सामने झाले असल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यापैकी १९ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळविला असून, २५ सामन्यांमध्ये पाकिस्तान विजयी झाला आहे. तीन सामने अनिर्णीत राहिले आहेत. त्याचप्रमाणे भारतीय खेळाडूंनी आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३२१ गोल केले असले तरी एफआयएचने भारतीय खेळाडूंनी ९८ गोल केले असल्याची नोंद केली आहे. वेळ : सायंकाळी ६ वाजता थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स