सुल्तान जोहर चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान आधीच निश्चित करणाऱ्या भारताने अखेरच्या साखळी सामन्यात यजमान मलेशियाला ३-३ असे बरोबरीत रोखले.
आकाशदीप सिंगच्या सुरेख कामगिरीमुळे भारताने १९व्या मिनिटाला खाते खोलले. आकाशदीपने मलेशियाचा गोलरक्षक मोहम्मद हाफीझुद्दीन ओथमन याला चकवून पहिला गोल केला. गगनदीप सिंगने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून भारताला २५व्या मिनिटाला २-० असे आघाडीवर आणले. तीन मिनिटानंतर मोहम्मद नूर फईझ इब्राहम याने मलेशियासाठी पहिला गोल केला. ४५व्या मिनिटाला मलेशियाच्या फिरहान अन्सारी याने दुसरा गोल करून बरोबरी साधली.
गुरमेल सिंगने ५८व्या मिनिटाला गोल करून भारताला पुन्हा आघाडीवर आणले. पण सामना संपायला काही सेकंद शिल्लक असताना नूर फईझ इब्राहम याने दुसरा गोल करून सामना बरोबरीत सोडवला. अंतिम सामना रविवारी होणार आहे.