इंग्लंडविरुद्ध राजकोट येथे ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड रविवारी केली जाणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कळवले आहे.भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी नवी दिल्लीत होणाऱ्या सामन्यानंतर संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीनंतर संघाची घोषणा केली जाईल. चार कसोटी सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकल्यानंतर आणि दोन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका बरोबरीत सोडवल्यानंतर इंग्लंड संघ नाताळ आणि नववर्षांच्या सुट्टीसाठी मायदेशी परतला आहे. इंग्लंड संघ एकदिवसीय मालिकेसाठी पुन्हा भारतात दाखल होणार आहे. इंग्लंडविरुद्धचे पाच सामने राजकोट (११ जानेवारी), कोची (१५ जानेवारी), रांची (१९ जानेवारी), मोहाली (२३ जानेवारी) आणि धरमशाला (२७ जानेवारी) येथे होणार आहेत.