रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये किमान एक डझन पदकांची अपेक्षा भारतीय खेळाडूंकडून केली जात असली तरी प्रत्यक्षात अपुऱ्या निधीमुळे त्यांचा हा मार्ग खडतर झाला आहे.

भारतीय खेळाडूंकरिता ‘ऑलिम्पिक पदक व्यासपीठ’ ही योजना केंद्रीय क्रीडा मंत्रालय व भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे राबवली जात आहे. संभाव्य पदक विजेत्यांना सरावासाठी किंवा क्रीडा सामुग्रीसाठी निधीची कमतरता पडू नये, हा त्या योजनेमागील उद्देश आहे. ऑलिम्पिकसाठी चाचणी स्पर्धेचा दर्जा लाभलेल्या नेमबाजी स्पर्धेत स्कीट खेळाडू मईराज खानला ऐनवेळी गोळ्यांची कमतरता भासल्यामुळे सुवर्णपदकाची संधी साध्य करता आली नाही. गगन नारंगलाही प्रोन विभागाच्या चाचणी स्पर्धेत गोळ्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्याला निराशाजनक कामगिरीला सामोरे जावे लागले.

भारतीय नौकानयन महासंघ व सैनिकी नौकानयन केंद्र यांच्या कात्रीत सापडल्यामुळे नौकानयनपटू दत्तू भोकनाळ याच्यापुढे आपण कोणाचे ऐकायचे, ही समस्या निर्माण झाली आहे. नौकानयन महासंघाने त्याला इटलीमधील प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे ठरविले तर सैनिकी केंद्राने त्याला अमेरिकेत प्रशिक्षणाकरिता पाठवण्याची योजना आखली होती.

टेनिसपटू सानिया मिर्झापुढेही अडथळ्यांचा मार्ग निर्माण झाला आहे. दुहेरीत पदकाचे आशास्थान असलेल्या या खेळाडूला योग्य साथ देईल अशी खेळाडू मिळालेली नाही. त्यामुळे तिच्या निधीत निम्म्याने कपात करण्यात आली आहे. अर्थात तिने ग्रँड स्लॅम व अन्य स्पर्धामधील सहभागाद्वारे आपला सराव सुरू ठेवला आहे. ती दुहेरीत प्रार्थना ठोंबरसोबत उतरण्याची शक्यता आहे. ऑलिम्पिक पदक व्यासपीठ योजनेंतर्गत प्रार्थनाला दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ऑलिम्पिक पदक व्यासपीठ योजनेबाबत झालेल्या बैठकीत मईराज व अन्य खेळाडूंबाबत निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चाही झाली.

हॉकी इंडियाने भारतीय संघातील खेळाडूंना दैनंदिन खर्चासाठी आर्थिक निधी द्यावा अशी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे मागणी केली आहे. मात्र ऑलिम्पिक पदक व्यासपीठ योजनेंतर्गत हे खेळाडू येत नसल्यामुळे त्यांना कशी मदत द्यावयाची, ही मंत्रालयापुढे समस्या निर्माण झाली आहे.