महाराष्ट्र सर्व बाद २१२, कर्नाटक १ बाद ५०

महाराष्ट्राच्या अनुभवी फलंदाजांच्या घरच्या मैदानावरीलही मर्यादा स्पष्ट झाल्या, त्यामुळेच रणजी क्रिकेट सामन्यात कर्नाटकच्या प्रभावी माऱ्यापुढे त्यांचा पहिला डाव २१२ धावांत कोसळला. उर्वरित वेळेत कर्नाटकने पहिल्या डावात १ बाद ५० धावा केल्या.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारपासून सुरू झालेल्या या सामन्यात कर्नाटकने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्यांनी केलेल्या अचूक माऱ्यापुढे अंकित बावणेचा अपवाद वगळता महाराष्ट्राचा एकही फलंदाज दीर्घकाळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्यामुळेच महाराष्ट्राकडून एकही भक्कम भागीदारी झाली नाही. कर्नाटकच्या श्रीनाथ अरविंदने सर्वाधिक तीन बळी घेतले. उर्वरित खेळात महाराष्ट्राने रविकुमार समर्थला बाद करीत उत्सुकता निर्माण केली.
या मोसमात महाराष्ट्राच्या फलंदाजांना अपेक्षेइतका सूर सापडलेला नाही. हा सामनादेखील त्याला अपवाद ठरला नाही. स्वप्निल गुगळे व संग्राम अतितकर यांनी सलामीसाठी ५० धावा जमविल्या नाही, तोच या दोन्ही फलंदाजांना बाद करण्यात कर्नाटकला यश मिळाले. गुगलने पाच चौकारांसह ३० धावा केल्या. त्यानंतर महाराष्ट्राच्या डावाची घसरगुंडी उडाली. अतितकर (१९), चिराग खुराणा (१०), राहुल त्रिपाठी (२), भारतीय संघाकडून खेळलेला केदार जाधव (११) यांनी सपशेल निराशा केली. शेवटच्या फळीत विशांत मोरेने चार चौकारांसह २५ धावा करीत बावणे याला साथ दिली. बावणेने आत्मविश्वासाने खेळ करीत २०९ मिनिटांमध्ये नाबाद ८७ धावा केल्या. त्यामध्ये त्याने ८ चौकार व ५ षटकार अशी फटकेबाजी केली.
कर्नाटकच्या अरविंदने केवळ ३५ धावांमध्ये तीन बळी घेतले. कर्णधार आर. विनय कुमार, अभिमन्यू मिथुन व होसगिवप्पा शरथ यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र (पहिला डाव) : ६२.४ षटकांत सर्व बाद २१२ (स्वप्निल गुगळे ३०, अंकित बावणे नाबाद ८७, विशांत मोरे २५; श्रीनाथ अरविंद ३/३५, आर. विनय कुमार २/४४).
कर्नाटक (पहिला डाव) : १९ षटकांत १ बाद ५० (रविकुमार समर्थ २०, मयांक अगरवाल खेळत आहे २५; श्रीकांत मुंडे १/१७).