आपला देश क्रिकेटफॅन्सचा आहे. इथे क्रिकेटर्सची देवळं बांधली जातात, त्यांच्यावर अभिषेक होतो, आपल्या आयडाॅलवर भाळलेल्या तरूणी बॅगा भरत ‘मला तुझ्याशी लग्न करायचंय’ सांगत त्या क्रिकेटरच्या घरादारासमोर ठिय्या मांडतात आणि निकाष कन्हारसारखे डायहार्ड फॅन्स कॅप्टन कोहलीला पाहायला आपल्या लग्नाची ठरलेली तारीखही पुढे ढकलतात.

तसं पाहिलं तर भारतात आणि पाकिस्तानमध्येही कट्टर चाहत्यांची कमी नाही. पण यामध्ये प्रसिध्दी खूप मोजक्या जणांना मिळते.

भारत पाकिस्तानची मॅच असली की पाकिस्तानी चाहत्यांच्या गर्दीत हमखास चेहरा दिसतो तो चौधरी अब्दुल जलील यांचा. भारत पाक मॅच आधीच हाय व्होल्टेज. त्यात जलीलचाचा आपल्या टीमसाठी जबराट चिअर करत असतात. नव्वदीच्या दशकापासून आजवर त्यांचा चेहरा टीव्हीवरून मॅचेस पाहणाऱ्या आपल्या सगळ्यांना चांगला ओळखीचा आहे.

pak-fan-jalil-pic
चौधरी अब्दुल जलील

 

सचिनची तर अख्खा भारत पूजा करतो. पण त्यातही सुधीर गौतमला तसंच सचिनचा डुप्लिकेट बलबीर चंदला चांगलीच प्रसिध्दी मिळाली.

सुधीर गौतम
मास्टर ब्लास्टर चा फॅन सुधीर गौतम

 

बलबीर चंद...सचिनचा डुप्लिकेट
बलबीर चंद…सचिनचा डुप्लिकेट

यातल्या सुधीर गौतमने तर आपल्या देव सचिन तेंडुलकरची मॅच पाहायला आपल्या लग्नाची तारीखही पुढे ढकलली. बलबीर चंदला त्याच्या सचिनशी मिळत्याजुळत्या चेहऱ्यामुळे अॅक्टिंगच्या आॅफर्सही मिळाल्या होत्या.

आता याच फॅन्सच्या यादीत निकाष कन्हारचं नाव जोडलं गेलंय. मूळचा ओरिसाचा असलेला निकाष भारताचा नवा कॅप्टन विराट कोहलीचा कट्टर चाहता आहे. कोहलीला पाहायला तो देशभर जिथेजिथे भारताच्या मॅचेस् असतील तिथेतिथे जाऊन स्टेडियममध्ये हजर राहतो. निकाष कन्हार कोहलीचा एवढा कट्टर चाहता आहे की त्याने पैसे उभारायला त्याच्या आईचे दागिने विकले! ईडन गार्डन्समध्ये आताच झालेल्या मॅचच्या वेळेसही निकाष स्टेडियममध्ये दिसला होता.

आईचे दागिने विकून कोहलीला भेटायचा आटापिटा!
आईचे दागिने विकून कोहलीला भेटायचा आटापिटा!

“मी विशाखापट्टणम्, कटक, रांची, कोलकाता आणि पंजाबमध्ये झालेल्या मॅचमध्ये स्टेडियममध्ये तिकीट काढून हजर राहिलो होतो” निकाष सांगतो. “मी कोहलीचा एवढा मोठा फॅन आहे की घरच्यचा जबाबदाऱ्याही मी मॅचपुढे विसरतो. नुकताच मी कोहलीला भेटलो. त्याने माझी प्रेमाने चौकशी केली”

आपल्या देशात अवलिये, ध्येयवेडे खोऱ्याने सापडतात. एखाद्या वेडापायी सगळंकाही विसरणं एकवेळ ठीक ठरेलही. पण आईचे दागिने विकत, घरातल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करत देशभर पायाला भिंगरी लावत फिरणं किती योग्य आहे असा प्रश्न मनात येतो आणि निकाष कन्हारसारख्यांचा विचार करताना हृदयाचा ठोका चुकतो.