एकिकडे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वावर उठणारे प्रश्नचिन्ह आणि दुसरीकडे विराट कोहलीचे दमदार फलंदाजीसह कुशल नेतृत्व, यावर चर्चा होत आहे. त्यामुळेच कोहलीकडे भारताच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेट नेतृत्व कोहलीकडे सोपवण्यात यावे, असे म्हटले जात आहे. भारतीय संघाचे माजी संचालक रवी शास्त्री यांनाही असेच वाटत असून धोनीने आता क्रिकेटचा आनंद लुटावा, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शास्त्री म्हणाले की, ‘जर मी निवड समितीचा अध्यक्ष असतो तर भविष्याच्या दृष्टीने आताच विचार करायला सुरुवात केली असती. आता विश्वचषकाला तीन वर्षांचा कालावधी आहे. त्यानुसार नव्या नेतृत्वाला संघबांधणीसाठी पुरेसा वेळ मिळू शकतो.’

ते पुढे म्हणाले की, ‘कल्पनाशक्तीवर अतिरीक्त ताण देण्याची गरज नाही. तुम्ही धोनीकडून नेतृत्व काढून घेतले तरी एक खेळाडू म्हणून तो संघासाठी भरीव कामगिरी करू शकतो. त्यासाठी धोनीला आता खेळाचा आनंद घेण्याची मुभा द्यायला हवी. धोनी अजूनही खेळासाठी किती भुकेला आहे, यावर सारे काही अवलंबून असेल. पण या घडीला कठिण निर्णय घ्यायलाच हवेत.’

ते पुढे म्हणाले की, ‘गेल्या काही वर्षांपासून कोहलीला घडवण्यात आले आहे, सध्याच्या घडीला तो भारतीय संघाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज आहे. आगामी १८ महिन्यांमध्ये भारतीय संघ जास्त एकदिवसीय क्रिकेट खेळणार नाही. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट यांच्यामध्ये पुरेसा अवधी आहे. त्यामुळेच आता भविष्याची पावले ओळखून निर्णय घेण्याची गरज आहे.’

यावेळी शास्त्री यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाचे उदाहरण दिले. ‘मार्क टेलर हा चांगला कर्णधार होता. पण त्यांनी स्टीव्ह वॉ याला घडवले. स्टीव्हनंतर त्यांनी रिकी पॉन्टिंग आणि त्यानंतर मायकेल क्लार्क यांना घडवत कर्णधारपद त्यांच्याकडे सोपवले. सध्याच्या घडीला क्लार्कनंतर त्यांना स्टीव्हन स्मिथसारखा कर्णधार मिळाला आहे.’