भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यातील चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ३०० धावांना प्रत्युत्तर देताना भारताने पहिल्या डावात ६ बाद २४८ अशी मजल मारली आहे. यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा आणि रवींद्र जाडेजा नाबाद असून आता भारतीय फलंदाजीची मदार या दोघांवर असणार आहे. तिसऱ्या दिवशी साहा आणि जाडेजा भारतीय संघाला आघाडी मिळवून देतात का, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. दरम्यान चेतेश्वर पुजारा आणि लोकेश राहुलची अर्धशतके दुसऱ्या दिवसाच्या खेळाचे वैशिष्ट्ये ठरली. दुसऱ्या दिवसाअखेर भारताने ६ बाद २४८ धावा केल्या असून भारतीय संघ अजूनही पाहुण्यांपेक्षा ५२ धावांनी मागे आहे. जाडेजा १६ तर साहा १० धावांवर नाबाद आहे. दुसऱ्या दिवसात भारताने संथगतीने फलंदाजी केली. पहिल्या सत्राचा खेळ सुरु होताच ११ व्या षटकात भारताला पहिला धक्का बसला. वेगवान गोलंदाज हेझलवूडने मुरली विजयला बाद करत भारताची सलामीची जोडी फोडली, तेव्हा भारताच्या केवळ २१ धावा झाल्या होत्या. विजय तंबूत परतल्यावर चेतेश्वर पुजाराने राहुलला चांगली साथ दिली. या दोघांनी पहिल्या सत्रात आणखी पडझड होऊ दिली नाही. पहिल्या सत्राअखेरीस भारताने १ बाद ६४ अशी मजल मारली होती. दुसऱ्या सत्रात पुजारा आणि राहुलने धावांचा वेग वाढवला. राहुल आणि पुजाराने संघाला १०० धावांचा टप्पा गाठून दिला. मात्र ४१ व्या षटकात कमिन्सच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा राहुलचा प्रयत्न फसला. वॉर्नरने सोपा झेल टिपत राहुलची अर्धशतकी खेळी संपुष्टात आणली. यानंतर पुजाराने कर्णधार अजिंक्य रहाणेला हाताशी घेत भारताची धावसंख्या वाढवली. दुसऱ्या सत्राअखेरीस भारताने २ बाद १५३ धावा केल्या. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात भारतीय फलंदाजांनी टिच्चून फलंदाजी केली असली तरी तिसऱ्या आणि अखेरच्या सत्रात कांगारुंनी कमबॅक केले. तिसऱ्या सत्राला सुरुवात होताच नॅथन लिऑनने भरवशाचा फलंदाज असलेल्या चेतेश्वर पुजाराला तंबूची वाट दाखवली. पुजाराने ५७ धावांची खेळी केली. पुजारा बाद झाल्यानंतर मैदानावर आलेला करुण नायर पुन्हा अपयशी ठरला. नायर अवघ्या ५ धावा काढून बाद झाला. यानंतर रहाणेने अश्विनच्या मदतीने भारताला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र लिऑयने ४६ धावांवर रहाणेला बाद करत भारताला पाचवा धक्का दिला. अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर लगेचच अश्विनदेखील ३० धावा काढून माघारी परतला. त्यामुळे भारताची अवस्था ६ बाद २२१ अशी झाली. लिऑनने तिसऱ्या सत्रात ४ फलंदाजांना बाद करत भारताला अडचणीत आणले. आता तिसऱ्या दिवशी भारताची मदार नाबाद असलेल्या साहा आणि जाडेजावर असेल. तर या दोघांना झटपट बाद करुन भारताचे शेपूट गुंडाळण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाकडून केला जाईल. त्यामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ कसोटी सामन्याच्या आणि मालिकेच्या निकालाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.