कोलकाता वनडेत अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढाईत इंग्लंडने पाच धावांनी विजय प्राप्त केला. इंग्लंडच्या ३२२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला ५० षटकांच्या अखेरीस ९ बाद ३१६ धावांपर्यंत मजल मारता आली. १७३ धावांवर संघाचे पाच महत्त्वाचे शिलेदार तंबूत दाखल झाले असताना केदार जाधवने हार्दिक पंड्याला साथीला घेत शतकी भागीदारी रचून सामना रंगतदार स्थितीत आणला होता. केदारने अखेरच्या षटकापर्यंत मैदानात उभे राहून भारतीय संघाच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. अखेरच्या षटकात २ चेंडूत सहा धावांची गरज असताना केदार झेलबाद झाला आणि भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. केदार यावेळी संघासाठी मॅच विनर ठरू शकला नसला तरी त्याने मोक्याच्या क्षणी मैदानात टिच्चून केलेल्या फलंदाजीचे सर्वांनी कौतुक केले. केदारने ७५ चेंडूत ९० धावा केल्या. केदार खेळपट्टीवर असेपर्यंत इंग्लंडच्या नाकी नऊ आले होते. इंग्लंडने कोलकातामध्ये विजय प्राप्त करून 'व्हाईटवॉश' टाळला. भारताने तीन सामन्यांनी मालिका २-१ अशी जिंकली. इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात निराशाजनक झाली. शिखर धवनच्या जागी संघात समावेश करण्यात आलेला अजिंक्य रहाणे(१) क्लीनबोल्ड झाला. त्यानंतर लोकेश राहुल देखील मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. मग कोहली आणि युवराज यांनी ६५ धावांची भागीदारी रचून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. बेन स्टोक्सने कोहलीला ५५ धावांवर बाद करून युवी-कोहली जोडी फोडून काढली. धोनी देखील यावेळी चांगली कामगिरी करू शकला नाही. युवराज सिंग(४५) झेलबाद झाल्यानंतर भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या होत्या. पण केदार जाधव आणि हार्दिक पंड्या यांनी फटकेबाजी सुरू ठेवून धावफलक हलता ठेवला. बघता बघता दोघांनी शतकी भागीदारी देखील पूर्ण केली. पंड्याने केवळ ३७ चेंडूत अर्धशतकी कामगिरी केली. मात्र, धावांची गती वाढविण्याच्या प्रयत्नात तो ५६ धावांवर झेलबाद झाला. बेन स्टोक्सने पंड्याची विकेट घेतली. पंड्या बाद होऊनही केदारने कोणताही दबाव निर्माण न होऊ देता एक बाजू लावून धरली होती. दुसऱया बाजूने जडेजा, अश्विन बाद झाले. त्यामुळे पराभवाचे सावट आणखी वाढत गेले. केदारने दबावाखाली खेळून चांगली फलंदाजी केली. अखेरीस त्याची झुंज अपयशी ठरली. पण तीन सामन्यांत २३२ धावा ठोकणाऱया केदारला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पहिल्या दोन सामन्यांनंतर कोलकाता वनडेत देखील तीनशेहून अधिक धावांचा पाऊस पडला आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत भारतीय संघासमोर विजयासाठी ३२२ धावांचे आव्हान ठेवले आहे. इंग्लंडकडून एकाही फलंदाजाने शतकी खेळी साकारली नसली तरी जेसन रॉयची दमदार सुरूवात, बेअरस्टो आणि मॉर्गनची मधल्या फळीत टीच्चून फलंदाजी आणि अखेरच्या षटकांत बेन स्टोक्सची फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने ३०० धावांचा टप्पा ओलांडला. ख्रिस वोक्सनेही अखेरच्या चार षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी करत १९चेंडूत ३४ धावांचे योगदान दिले. त्यामुळे ५० षटकांच्या अखेरीस इंग्लंडला ८ बाद ३२१ धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या सलामीजोडीने दमदार सुरूवात करून दिली. जेसन रॉय आणि सॅम बिलिंग्ज यांनी सुरूवातीची दोन षटके खेळून काढल्यानंतर आपले खरे रुप दाखवण्यास सुरूवात केली. रॉयने आपल्या तडफदार फटक्यांनी धावा वसुल करण्यास सुरूवात केली आणि अर्धशतक देखील पूर्ण केले. इंग्लंडची सलामीजोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत असताना रवींद्र जडेजाने जेनिंग्जला बाद केले. त्यानंतर दुसरी विकेट देखील जडेजानेच घेतली. घातक जेसन रॉय(६५) याचा जडेजाने त्रिफळा उडवून तंबूत धाडले. त्यानंतर कर्णधार मॉर्गन आणि बेअरस्टो यांनी चांगली फटकेबाजी करून डाव सावरला. पण पंड्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात मॉर्गन ४३ धावांवर झेलबाद झाला. बेअरस्टोने अर्धशतक ठोकले खरे पण तो देखील ५६ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. जडेजाने पॉईंटमध्ये बेअरस्टोचा अफलातून झेल टीपला. जोस बटलरला(११ देखील पंड्याने माघारी धाडले. तर बुमराहने मोईन अली याला बाऊन्सवर झेलबाद करून चालते केले. बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्स यांनी ७ व्या विकेटसाठी केवळ ६.४ षटकांत तब्बल ७३ धावांची भागीदारी रचली आणि संघाला तीनशेचा आकडा गाठून दिला. Cricket Score, India vs England-