भारतीय संघाने कानपूर कसोटी १९७ धावांनी जिंकली असून, न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. कसोटीच्या पाचव्या दिवशी फिरकीपटू अश्विनने आपल्या फिरकी जादूने किवींना गारद केले. अश्विनने दुसऱया डावात तब्बल ६ विकेट्स घेतल्या, तर जडेजाने एका फलंदाजाला माघारी धाडले. मोहम्मद शमीनेही दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवरील भारतीय संघाची ही ५०० कसोटी होती. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील संघाने या कसोटीवर विजयी मोहोर उमटवली आहे. दोन्ही डावात मिळून अश्विनने एकूण १० विकेट्स घेतल्या, तर जडेजाच्या खात्यात ६ विकेट्स जमा झाल्या. न्यूझीलंडकडून ल्यूक राँचीने सर्वाधिक ८० धावांचे योगदान दिले, तर सँटनरनेही (७१) चांगली झुंज दिली. अर्धशतकी खेळी आणि सामन्यात ६ विकेट्स मिळविलेला रवींद्र जडेजा सामनावीराचा मानकरी ठरला. कसोटीच्या पाचव्या दिवशी मैदानात जम बसवलेले न्यूझीलंडची ल्यूक राँची आणि मिचेल सँटनर जोडी फोडण्यात भारतीय संघाला आजच्या दिवसातील २१ व्या षटकानंतर यश आले होते. रवींद्र जडेजाने भारतीय संघाला पाचवे यश मिळवून दिले. मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका मारण्याच्या नादात राँची ८० धावांवर झेलबाद झाला. राँची आणि सँटनर यांनी शतकी भागीदारी रचली. राँची बाद झाल्यानंतर मोहम्मद शमीने आपल्या भेदक माऱयाने बी.जे.वॉल्टिंग याला १८ धावांवर पायचीत केले, तर मार्क क्रेग याचा त्रिफळा उडवून त्याला स्वस्तात माघारी धाडले. उपहारापर्यंतच्या आकडेवारीनुसार न्यूझीलंडच्या ७ विकेट्स पडल्या होत्या. त्यामुळे भारताने जवळपास कसोटी आपल्या खिशात टाकली होती. उपहारानंतरच्या खेळात फक्त भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. अश्विनने उपहारानंतर अफलातून फिरकीच्या जोरावर किवींना नामोहरम केले आणि कसोटी १९७ धावांनी जिंकली. वाचा: .म्हणून भारतीय संघाला ५०० वी कसोटी जिंकता आली तत्पूर्वी, चौथ्या दिवसाअखेरीस न्यूझीलंडला चार फलंदाजांच्या मोबदल्यात केवळ ९३ धावा करता आल्या होत्या. भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी ४३९ धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले होते. सामन्याच्या चौथ्या दिवसात आर. अश्विनने न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडले होते, तर उमेश यादवने सीमा रेषेवरून दिलेल्या अचूक थ्रोवर रॉस टेलर धावचीत झाला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ल्यूक राँची ३८ धावांवर , तर मिचेल सँटनर ८ धावांवर खेळत होते. तत्पूर्वी, भारतीय संघाने आपला दुसरा डाव ५ बाद ३७७ धावांवर घोषित करून किवींसमोर ४३९ धावांचे आव्हान उभे केले. रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजाच्या तुफानी खेळीने भारताला चौथ्या दिवशी चहापानापूर्वीच ३७५ चा पल्ला ओलांडता आला. चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय या दोघांनी अर्धशतकी खेळी करत दुस-या डावात भारताला दमदार सुरुवात केली होती. मात्र विराट कोहली १८ धावांवर माघारी परतल्याने भारताच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले. पण त्यानंतर अजिंक्य रहाणे संयमी ४० धावांची खेळी करत रोहित शर्माच्या साथीने भारताचा डाव पुढे नेला. अजिंक्य रहाणेने ८१ चेंडूत ४० धावा केले. यात चार चौकारांचा समावेश आहे. अजिंक्य रहाणे बाद झाल्यावर रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा या जोडीवर भारताची मदार होती. गेल्या काही सामन्यात सूर सापडत नसल्याने टीकेचे लक्ष्य ठरलेल्या रोहित शर्माला शेवटी आज सूर गवसला. रोहित शर्माने रविंद्र जडेजाच्या साथीने किवी गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. या दोघांनीही चौकार आणि षटकारांची बरसात केली. रोहित शर्माने ९३ चेंडूत ६८ धावा केल्या. यामध्ये ८ चौकारांचा समावेश होता. तर रविंद्र जडेजाने ५८ चेंडूत ५० धावा केल्या. यात दोन चौकार आणि तीन षटकाराचा समावेश आहे. भारताने ५ विकेटच्या मोबदल्यात ३७७ धावा केल्या असताना विराट कोहलीने भारताचा डाव घोषित केला. न्यूझीलंडतर्फे सँटनर आणि इश सोधी या दोघांनी प्रभावी मारा केला. या दोघांनी प्रत्येक दोन गडींना बाद केले. तर मार्क क्रेगने एक विकेट घेतली. India (Ind) vs New Zealand (NZ) - दिवसभरातील अपडेट्स