कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवरील न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने ७ विकेट्सच्या मोबदल्यात २३९ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघाकडून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी खेळी साकारली. कोलकाता कसोटीचा नाणेफेक जिंकून भारतीय संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली. लोकेश राहुल दुखापतग्रस्त असल्याने संघात संधी मिळालेला शिखर धवन केवळ एक धाव करून माघारी परतला. त्यानंतर मुरली विजय देखील यावेळी मोठी खेळी करू शकला नाही. दोघांनाही न्यूझीलंडच्या मॉट हेन्रीने माघारी धाडले. कर्णधार कोहलीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा केली जात असताना त्यानेही निराशा केली. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर कव्हर्सच्या दिशेने फटका मारण्याच्या नादात कोहलीच्या बॅटला स्पर्श करून गेलेला चेंडू गलीमध्ये उभ्या असलेल्या लॅथमच्या हातात विसावला. कोहली केवळ ९ धावा करून माघारी परतला. भारतीय संघाचे पहिले तीन शिलेदार स्वस्तात माघारी परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी भारतीय संघाचा डाव सावरून मैदानात चांगलाच जम बसवला. पुजाराने ८७ धावांचे, तर अजिंक्य रहाणेने ७७ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान देऊन भारतीय संघाला सावरले. रहाणे बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि अश्विन देखील प्रत्येकी २ आणि २६ धावांवर माघारी परतले. पहिल्या दिवसाचा खेळ संपूर्ण ९० षटकांचा होऊ शकला नाही. कमी सुर्यप्रकाशामुळे खेळ ८६ षटकांमध्येच थांबविण्यात आला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ७ बाद २३९ अशी आहे. रवींद्र जडेजा(०) आणि वृद्धीमान साहा(१४) धावांवर खेळत आहेत. न्यूझीलंडकडून हेन्रीने तीन, तर फिरकीपटू जीतन पटेल याने दोन विकेट्स घेतल्या. बोल्ट आणि वँगर यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. India vs New Zealand - दिवसभरातील अपडेट्स