माजी हॉकीपटू सोमय्या यांना विश्वास मॉस्को येथे १९८० साली पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पध्रेत भारतीय पुरुष हॉकी संघाने सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर झालेल्या ऑलिम्पिक स्पध्रेत भारतीय संघाला सातत्याने अपयश आले. पदक सोडाच भारतीय संघाला अव्वल पाचांमध्येही स्थान पटकावण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र, पुढील महिन्यात होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत भारतीय पुरुष हॉकी संघ पदक पटकावेल, असा विश्वास भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार एम. एम. सोमय्या यांनी व्यक्त केला. मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे शुक्रवारी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासह मॉस्को ऑलिम्पिक स्पध्रेत सहभागी असलेल्या महिला संघाच्या कर्णधार एलिझा नेल्सन याही उपस्थित होत्या. सोमय्या म्हणाले की, ‘‘भारत पदकाचा प्रबळ दावेदार आहे. प्रशिक्षक रोअलंट ओल्टमन्स यांनी उत्तमरित्या संघाला घडवले आहे. त्यांनी खेळाडूंच्या शैलीत अमुलाग्र बदल केले.’’ नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स चषक स्पध्रेत भारतीय पुरुष संघाच्या कामगिरीने सोमय्या यांना प्रभावित केले. या स्पध्रेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. १९८८च्या सेऊल स्पध्रेत संघाचे नेतृत्व करणाऱ्या सोमय्या यांनी ओल्टमन्स यांचेही कौतुक केले. ‘‘प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास करून प्रत्येक सामन्यात ओल्टमन्स खेळाचे स्वरूप बदलत राहतात. सामन्यातही त्यांचे हे प्रयोग सुरू असतात. प्रत्येक स्पध्रेत त्यांनी नवीन प्रयोग केले. त्यांच्या या कौशल्यामुळे खेळाडूही अष्टपैलू झाले आहेत आणि त्यामुळे प्रतिस्पर्धीही बुचकळ्यात पडले आहेत,’’ असे तीन (१९८०, ८४ व ८८) ऑलिम्पिक स्पध्रेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारे सोमय्या म्हणाले.