पालम मैदानावर मुंबई आणि सेनादल यांच्यातील सामन्य़ात पहिल्या डावातील आघाडीच्या निकषावर सेनादलाचा २१४ धावांनी पराभव करत मुंबईने  रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
सामना निर्णायक होण्यासाठी बाद फेरीचे सामने सहाव्या दिवशी खेळवण्याची तरतूद आहे. यानुसार आज (सोमवार) पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे  मुंबईला विजयी घोषित करण्यात आले. हिमवर्षांव आणि पावसामुळे या सामन्याचा २५० षटकांचा खेळ वाया गेला. मुंबईनं सहाव्या दिवशी सेनादलाचा पहिला डाव २४० धावांत गुंडाळून धावांची आघाडी मिळवली. ४४व्या रणजी जेतेपदापासून अवघे एक पाऊल दूर असलेल्या मुंबईने ८ बाद ४५४ धावांवर आपला डाव घोषित केला होता. त्यानंतर धवल कुलकर्णी आणि शार्दूल ठाकूरने सेनादलाचा पहिला डाव २४० धावांत गुंडाळला. धवलने ३३ धावांत पाच आणि शार्दूलने ६२ धावांत तीन विकेट्स घेतल्या. मुंबईत २६ ते ३० जानेवारी या कालावधीत रणजी करंडकाच्या अंतिम फेरीमध्ये मुंबईचा मुकाबला सौराष्ट्रशी होणार होणार आहे.