क्रिकेटमध्ये संघाची सेवा करण्याच्याच उद्देशाने मी कारकीर्द केली. मला मोजकेच कसोटी सामने मिळाले असले तरी ज्या खेळाने मला मोठे नाव दिले त्या क्रिकेटचेच ऋण फेडण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत मी अजूनही मैदानावर उभा असतो, असे ज्येष्ठ क्रिकेटपटू पांडुरंग साळगांवकर यांनी सांगितले. साळगांवकर यांनी अतिशय वेगवान गोलंदाज म्हणून ख्याती मिळविली होती. १९७३-७४ च्या मोसमात त्यांनी स्थानिक सामन्यांमध्ये महाराष्ट्राकडून खेळताना सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांना भारतीय संघात स्थान मिळाले होते मात्र भारतीय संघात एकेकाळी फिरकी गोलंदाजांचाचे वर्चस्व असल्यामुळे साळगांवकर यांना भारताकडून मोजक्याच कसोटींमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. असे असूनही क्रिकेट कारकीर्दीविषयी ते खूप समाधानी आहेत. या खेळाच्या ऋणात राहण्यासाठीच ते प्रशिक्षक, पंच, संघटक म्हणून कार्यरत असतात. गेले काही वर्षे त्यांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे मुख्य खेळपट्टी तज्ज्ञ म्हणूनही स्वतंत्र ठसा उमटविला आहे. साळगांवकर म्हणाले, पूर्वीच्या काळी बहुतांश क्रिकेटपटू नोकरी व घरदार सांभाळून क्रिकेटची कारकीर्द करीत असत. तरीही सर्वच खेळाडू संघनिष्ठेनेच खेळत असत. त्यामुळे खेळाचा निखळ आनंद कसा मिळेल हाच दृष्टिकोन असायचा. नैसर्गिक शैलीनेच खेळण्यावर भर असे. इरापल्ली प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर, बिशनसिंग बेदी यांच्यासारखे महान फिरकी गोलंदाज तसेच अजित वाडेकर यांच्यासारख्या श्रेष्ठ फलंदाजांसमवेत खेळण्याची संधी मिळाली याचा मला खूप अभिमान वाटतो. ग्रामीण भागातून माझे क्रिकेट करिअर विकसित झाल्यामुळे खेळाडूंना नावलौकिक मिळविण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हा अनुभव स्वत: मी घेतला आहे. आता खेळात व्यावसायिकता आल्यामुळे खेळाचे स्वरुप बदलत चालले आहे. ट्वेन्टी२० व एक दिवसीय सामन्यांमध्ये फलंदाज व गोलंदाजांना कसोटीपेक्षा थोडे वेगळे नियोजन करावे लागते. झटपट क्रिकेटची लोकप्रियता वाढली आहे. तरीही कसोटीचा आनंद काही वेगळाच असतो. पाच दिवसांच्या या सामन्यात फलंदाज, गोलंदाज व क्षेत्ररक्षक यांच्या सर्वागीण गुणांची सत्त्वपरीक्षा असते. क्रिकेटमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांनी कसोटीचा मनापासून आनंद घेतला पाहिजे. आपले व परदेशी खेळाडू कसे कौशल्य दाखवितात याचा बारकाईने अभ्यास त्यांनी केला पाहिजे असेही साळगांवकर यांनी सांगितले. आगामी कसोटीबाबत साळगांवकर म्हणाले, भारतीय संघाने क्रिकेटच्या सर्वच स्वरुपांच्या सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी करीत वर्चस्व गाजविले आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आयपीएलमुळे भारतीय हवामान, खेळपट्टी आदीचा अनुभव असला तरी भारतीय खेळाडू या कसोटी मालिकेत चांगले यश मिळवतील अशी मला खात्री आहे.