“बंगालच्या संघात खेळताना माझ्यावर कर्णधार म्हणून संघाची जबाबदारी होती. मात्र आता दिल्लीत आल्यावर समीकरण थोडी बदलली आहेत. मिराज संघाचा कर्णधार आहे… मात्र सिनिअर खेळाडू म्हणून शेवटी संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी माझ्यावर येतेच.” प्रो-कबड्डीमधल्या आपल्या नवीन प्रवासाबद्दल दबंग दिल्लीचा निलेश शिंदे आणि बाजीराव होडगेने खास ‘लोकसत्ता ऑनलाईन’शी संवाद साधला.

कबड्डी हा जितका रेडर्सचा खेळ आहे, तितकाच तो बचावपटूंचाही खेळ आहे. रेडर आपल्या खेळीदरम्यान जास्तीत जास्त पॉईंट आणण्याचा प्रयत्न करत असतो, कधी त्याला यश येतं तर कधी येत नाही. मात्र जरी त्याला रेड करताना यश आलं नाही, तरीही बचावपटूंना समोरच्या खेळाडूला बाद करावचं लागतं. तिकडे कसलीही चूक करुन भागत नाही. संघाचा बचावपटू जर निट खेळला तर तो तुम्हाला सामना जिंकवून देऊ शकतो. मात्र मोक्याच्या क्षणी त्याने केलेली एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे एक बचावपटू म्हणून आपल्याला कायम दक्ष रहावं लागत असल्याचं निलेश शिंदे म्हणाला.
प्रो-कबड्डीची पहिली ३ पर्व निलेश शिंदे बंगाल वॉरियर्स या संघाचा कर्णधार होता. मात्र यंदाच्या हंगामात त्याला दबंग दिल्लीने आपल्या संघात घेतलं आहे.

harsul jail police murder marathi news
छत्रपती संभाजीनगर: हर्सूल कारागृह आवारात पोलिसाचा खून; एक गंभीर
madhurimaraje chhatrapati
प्रचाराच्या धकाधकीत मधुरिमाराजे छत्रपतींनी क्रिकेटचा घेतला आस्वाद; संभाजीराजेंनी मारली नदीत डुबकी
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक
Dilip Mohite patil,Shivajirao Adhalarao Patil
“आमच्यावर अविश्वास दाखवलात तर…”, पक्षप्रवेशावेळी मोहिते पाटलांचा शिवाजीराव आढळरावांना इशारा

यावेळी निलेशच्या खांद्यांवर कर्णधारपदाची जबाबदारी नसली तरीही सिनिअर खेळाडू म्हणून आपल्या सहकाऱ्यांच्या आणि प्रशिक्षकांच्या आपल्याकडून काही अपेक्षा असतातच. त्यामुळे कितीही नाकारलं तरी प्रत्येक सामन्यात आपल्यावर जबाबदारी येत असल्याचं निलेश म्हणाला. त्यामुळे प्रत्येक सामन्यात आपल्या खेळात सुधारणा होणं गरजेचं असल्याचं निलेश म्हणाला. यंदाच्या हंगामात दबंग दिल्लीने आपल्या पहिल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सचा पराभव करत विजयी सुरुवात केली. यामध्ये दिल्लीकडून निलेश शिंदे, बाजीराव होडगे यांनी बचावात तर कर्णधार मिराज शेख आणि अबुफजल मग्शदूलू यांनी रेडींग डिपार्टमेंटमध्ये चमकदार कामगिरी केली.

या सामन्यात निलेश शिंदेने केलेली कामगिरी ही नक्कीच वाखणण्याजोगी होती. जयपूर पिंक पँथर्सच्या जसवीर सिंहला निलेश शिंदेने टॅकल करत या पर्वात आपलं झोकात पुनरागमन केलं. याचं श्रेय मात्र निलेशने दबंग दिल्लीचे प्रशिक्षक मेंढीगिरी सर यांना दिलं आहे. पहिल्या सामन्याआधी सरांनी मला जसवीरच्या खेळाच्या जागा, त्याला पकडण्यासाठी केलेलं टेक्निकल अॅनेलिसीस या सर्व समजावून सांगितल्या होत्या. त्यामुळे त्याला टॅकल करण्यासाठी मी डोक्यात एक प्लान ठरवून ठेवला होता. तो फक्त मी मैदानात वापरत गेलो आणि जसवीर माझ्या जाळ्यात अडकत गेला. यावेळी निलेशने दबंग दिल्लीच्या व्यवस्थापनाचाही आवर्जून उल्लेख केला. यंदा स्पर्धेचा हंगाम मोठा असणार आहे, त्यामुळे आम्हा सर्वांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. यासाठी आमचा सपोर्ट स्टाफ रात्री-अपरात्रीही आमच्यासाठी धावून येत असल्याचं निलेशने सांगितलं.

यावेळी निलेशने आपला सहकारी बाजीराव होडगेच्या खेळाचं मनापासून कौतुक केलं. बाजीराव होडगे अत्यंत उमदा खेळाडू आहे. आम्ही पहिली ३ पर्व बंगालकडून एकत्र खेळलो आहोत. त्यामुळे आमच्यातला ताळमेळ चांगला आहे. त्यामुळे आजही अनेक चांगल्यातले चांगले रेडर आमच्या जोडीला घाबरत असतात. आणि हेच आमचं यश असल्याचं निलेशने सांगितलं. तरीही पहिल्या सामन्यात आम्ही योग्य पद्धतीने खेळलो नसल्याचं निलेश म्हणाला. पहिल्याच खेळात आमच्याकडूनही अनेक चुका झाल्या. फक्त वेळेत आम्ही स्वतःला सावरू शकल्याने आम्हाला विजय मिळवता आला. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये आम्हाला या चुका सुधारुन आणखी चांगला खेळ करायचा असल्याचं निलेशने सांगितलं.

यंदाच्या पर्वात दबंग दिल्लीची जबाबदारी इराणच्या मिराज शेखकडे आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून मिराज आणि संघामधील खेळाडूंचा संवाद कसा असतो याबद्दल विचारलं असता, मिराज इराणचा असल्यामुळे त्याला थोडं थोडं हिंदी बोलता येत असल्याचं निलेश म्हणाला. पण मिराजही आंतराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू असल्यामुळे मैदानात आम्हाला संघ म्हणून काय करायचं आहे, हे त्याच्या डोक्यात पक्क असतं. त्यामुळे कर्णधार म्हणून आम्हाला कधीही भाषेचा अडसर झाला नाही असंही निलेशने आवर्जून सांगितलं. गेले काही हंगाम इराणचे खेळाडू प्रो-कबड्डीचा हंगाम गाजवतायत. त्यांच्या खेळाबद्दल विचारलं असता, इराणच्या खेळाडूंमध्ये प्रचंड ताकद आणि उर्जा असल्याचं निलेश म्हणाला. त्यामुळे मैदानात कसंही करुन पॉईंट मिळवायचे एवढंच त्यांच्या डोक्यात असतं. मात्र गोष्ट जेव्हा डावपेचांवर येते तिकडे भारतीय खेळाडू उजवे ठरतात, कारण कबड्डी हा नुसता ताकदीचा नाही तर डावपेचांचा खेळ असल्याचंही निलेशने सांगितलं.

दबंग दिल्लीचा यंदाचा संघ हा महाराष्ट्राच्या खेळाडूंनी भरलेला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यापैकी दिल्लीच्या संघातून पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी करणारा आणखी एक खेळाडू म्हणजे मुळचा कोल्हापूरचा मात्र सध्या मुंबईत स्थायिक असलेला बाजीराव होडगे. आपल्या क्लबसाठी बाजीरावने सर्वप्रथम रेडर म्हणून खेळायला सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर रेडींग करणं त्याला काही केल्या जमेना म्हणून आपल्या प्रशिक्षकांच्या सांगण्यावरुन बाजीराव बचावपटू झाला. अत्यंत हडकुळ्या देहयष्टीचा बाजीराव मैदानात मात्र एखाद्या मल्लाला लाजवेल, असा खेळ करतो. आपल्यापेक्षा अंगापिंडाने मोठ्या खेळाडूंना बाजीराव आपल्या डॅशने मैदानाबाहेर करतो. म्हणूनच अनेक खेळाडू रेड करताना बाजीराववर आपली नजर ठेऊन असतात.

बाजीरावनेही आपला खेळ सुधारण्याचे श्रेय निलेशला दिलं. निलेशने आतापर्यंत मला मोठ्या भावासारखं सांभाळलं आहे. मैदानात मला अनेक वेळा तो सावरुन घेतो, डिफेन्स कसा सुधारायचा याच्या टिप्स देतो. त्यामुळे गेली काही वर्षे त्याला बघत बघत मी शिकत असल्याचं बाजीराव म्हणाला. बंगालकडून खेळताना बाजीराव आणि निलेशच्या जोडगोळीने एकाच पर्वात डिफेन्समध्ये तब्बल १९८ पॉईंट घेतले होते. तो क्षण आपण आयुष्यात कधीही विसरु शकणार नसल्याचं बाजीराव म्हणाला. तिसऱ्या पर्वात अनुप कुमारला केलेलं टॅकलही आपल्या कायम लक्षात राहिलं असं बाजीरावने यावेळी आवर्जून नमूद केलं.

याव्यतिरीक्त यंदा दिल्लीच्या संघात विराज लांडगे आणि आनंद पाटील सारखे काही नवीन खेळाडू आले आहेत. नवोदितांसोबत खेळताना आपल्याला प्रचंड फायदा होतो. नवीन मुलांकडे अनेक आयडिया असतात, सरावादरम्यान ही मुलं आम्हाला, त्यांच्या डोक्यातले अनेक प्लान सांगत असतात. एक खेळाडू म्हणून आम्हाला त्यांच्याकडून बरंच काही शिकता येण्यासारखं आहे, असंही बाजीरावने मोठ्या मनाने कबुल केलं आहे.