व्ही. आर. रघुनाथने दोन शानदार गोल करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताच्या जपानवरील विजयात निर्णायक भूमिका बजावली. भारताने जपानवर ३-१ असा सहज विजय मिळवला. उपकर्णधार रघुनाथने २२व्या मिनिटाला गोल करत भारताचे खाते उघडले. मात्र ५०व्या मिनिटाला कोजी कायुकवाने जपानतर्फे गोल केला आणि १-१ अशी बरोबरी साधली. पुढच्याच मिनिटाला गुरविंदर सिंग चंडीने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. ५९व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचा फायदा उठवत रघुनाथने आणखी एक गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सलग तीन पेनल्टी कॉर्नरपैकी एकाचे गोलमध्ये रुपांतर करण्यात भारताला यश मिळाले. चीनविरुद्धच्या लढतीतही दोन गोल करत रघुनाथने आपली छाप सोडली होती.
जपानने चांगला खेळ केला. त्यांच्या बचावामुळे आम्हाला गोल करण्यासाठी खुप वेळ प्रतीक्षा करावी लागली. आमच्या हातून काही चुका झाल्या. आम्ही आणखी ४-५ गोल करायला हवे होते, असे भारताचे प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांनी सांगितले.