देशातल्या क्रिकेटसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असे मत महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले. मात्र बीसीसीआयचे प्रशासन सुधारावे यासाठी स्थापित लोढा समिती आणि शिफारशींबद्दल सचिनने वक्तव्य करण्यास नकार दिला. देशातील क्रिकेटचे नियंत्रण करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय सध्या लोढा समितीच्या रडारवर आहे. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील गैरव्यवहारांची प्रकरणे उघड झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे प्रशासन पारदर्शक करण्यासाठी काय करता येईल यासाठी लोढा समितीची स्थापना केली. लोढा समितीने असंख्य शिफारशींची जंत्री सादर केली. मात्र विविध स्वरूपांची सत्ताकेंद्रे उद्ध्वस्त होणार असल्याने बीसीसीआय शिफारशींच्या अंमलबजावणीत चालढकल करत आहे. लोढा समितीने विविध आघाडय़ांवर कानउघाडणी केल्याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिका तसेच रणजी करंडक स्पर्धेचे आयोजन धोक्यात आले होते. सध्या सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका सुरू होण्यापूर्वी निधी पुरवठय़ावरून तिढा निर्माण झाला होता. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी केल्यास बीसीसीआयचा चेहरामोहराच पालटू शकतो तसेच आर्थिक साम्राज्याला धक्का लागू शकतो. बीसीसीआयवर चहूबाजूंनी टीका होत असतानाच तेंडुलकरने संघटनेच्या क्रिकेटसाठीच्या योगदानाबद्दल विचार मांडले. ‘‘मी लहानाचा मोठा झालो तेव्हा बीसीसीआयने मला नेहमीच पाठिंबा दिला. बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनने असंख्य शिबिरे आयोजित केली ज्याचा फायदा असंख्य गुणी क्रिकेटपटूंना झाला. बीसीसीआयने खेळाडूंची नेहमीच काळजी घेतली आहे. सगळ्याच गोष्टी अचूक असू शकत नाही,’’ असे सचिनने सांगितले. शालेय क्रिकेटमध्ये १४ खेळाडूंचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना सचिनने केली होती. त्याविषयी विचारले असता सचिन म्हणाला, ‘‘अधिकाधिक खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी या विचारातून मी ही सूचना मांडली. त्यांनी नव्या हंगामात याची अंमलबजावणी केली. यामुळे १८०० मुलांना खेळण्याची संधी मिळाली.’’ कसोटी क्रिकेटला कमी होत जाणाऱ्या जनाधाराविषयी सचिन म्हणाला, ‘‘मी खेळत होतो त्या वेळी खेळाडूंमधील द्वंद्व पाहण्यासाठी चाहते गर्दी करत असत. सुनील गावस्कर विरुद्ध इम्रान खान, व्हिव रिचर्ड्स विरुद्ध जेफ थॉमसन, ब्रायन लारा विरुद्ध ग्लेन मॅकग्रा असा मुकाबला पाहण्यासाठी चाहते आतुर असत. ८० आणि ९०च्या दशकांतील वेस्ट इंडिज संघाने सातत्यपूर्ण खेळासह चाहत्यांना अमाप आनंद दिला. वेस्ट इंडिजला नमवणे अन्य संघांसमोरचे खडतर आव्हान असे. वेस्ट इंडिजप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या संघाने दबदबा राखला होता. आता असे द्वंद्व पाहायला मिळत नाही.’’ ‘‘२०१४ मध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा दौरा केला होता. आम्ही मालिका गमावली. आता इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे आणि ते मालिकेत पिछाडीवर आहेत. या दोन वर्षांच्या कालावधीत इंग्लंड संघातील प्रमुख खेळाडू निवृत्त झाले आहेत. एकाच संघाविरुद्ध सुरुवातीचे सामने मायदेशात आणि पुढचे सामने प्रतिस्पर्धी संघाच्या देशात खेळवावेत असे वाटते. संघ तोच असेल, पण देश बदलल्याने आव्हान खडतर होईल. दुखापतींमुळे काही खेळाडू खेळू शकणार नाहीत; पण संघाचे मूळ स्वरूप कायम राहील. एकाच मालिकेत दोन भिन्न देशांत सामने झाले तर रंजकता वाढेल,’’ असे सचिनने स्पष्ट केले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे सचिनने कौतुक केले. ‘‘२०००-२००१ कालावधीत भारतीय संघ अजिंक्य होता. त्या संघात जागतिक दर्जाचे वेगवान आणि फिरकी आक्रमण होते. तो संघ सार्वकालीन महान संघ होता. कोहलीचा संघही सातत्याने सर्वसमावेशक प्रदर्शन करत आहे.’’ रणजी सामन्यांमध्ये दोन खेळपटय़ांचा वापर व्हावा चांगला कसोटी संघ तयार करण्यासाठी रणजी करंडक स्पर्धेच्या लढतीत दोन खेळपटय़ा उपयोगात आणण्याची सूचना तेंडुलकरने केली आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज या देशांमध्ये कुकाबुरा चेंडूचा वापर केला जातो. आपल्या इथे रणजी स्पर्धेत एसजी चेंडू उपयोगात आणला जातो. रणजी स्पर्धेत चांगले प्रदर्शन करणारा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षित कामगिरी करू शकत नाही. यासाठी रणजीच्या लढतींसाठी दोन खेळपटय़ा असायला हव्यात. पहिला डाव गवत राखलेल्या खेळपट्टीवर कुकाबुरा चेंडूसह व्हावा. दुसऱ्या डावात एसजी चेंडूंचा प्रयोग व्हावा. जेणेकरून आपल्या फलंदाजांना दर्जेदार फिरकी खेळण्याचा सराव व्हावा. आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवान गोलंदाजीचा सामना कसा करावा यावर आपला भर असतो. परंतु अव्वल दर्जाच्या फिरकी गोलंदाजीचा समर्थपणे सामना कसा करावा यावरही लक्ष द्यायला हवे. नाणेफेक जिंकली म्हणजे १० टक्के विजयाचे पारडे आपल्या बाजूने झुकले असे कर्णधारांना वाटते. गवत असलेल्या खेळपट्टीवर गोलंदाजीचा निर्णय कर्णधार घेऊ शकतो. मात्र त्याच वेळी चौथ्या डावात चेंडू प्रचंड वळणाऱ्या खेळपट्टीवर खेळण्याचे आव्हान फलंदाजांसमोर असते.