सुरेश रैनाने ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये आपले स्थान सिद्ध केले असून आतापर्यंतच्या कामगिरीमुळे त्याला आणखी मोठय़ा सामन्यांमध्ये जबाबदारी उचलण्यास मदत होणार आहे, अशा शब्दांत भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी रैनाचे कौतुक केले आहे.
रैनाने येथील स्पर्धेत आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी केली असून, त्याच्या कामगिरीचे श्रेय त्याने गांगुलीकडून मिळालेल्या मौलिक सल्ल्यास दिले आहे. रैनाविषयी गांगुली म्हणाले, कमी षटकांच्या सामन्यात रैना हा अतिशय आकर्षक फलंदाजी करतो. प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायक फलंदाज म्हणून त्याने ख्याती मिळविली आहे. येथील स्पर्धेतील कामगिरीमुळे भविष्यात तो भारतीय संघाचा मुख्य आधारस्तंभ होईल.
भारतीय संघ जुलै ते सप्टेंबर या कालावधीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्यानंतर २०१५ मध्ये एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या सामन्यांमध्ये रैनाकडून फार मोठी कामगिरी अपेक्षित आहे व तो भारतास चांगले यश मिळवून देईल असा आत्मविश्वासही गांगुली यांनी व्यक्त केला.