पाकिस्तानच्या सैन्याने भारताच्या दोन जवानांना ठार मारल्याच्या निषेधार्थ हॉकी इंडिया लीग स्पर्धेतून पाकिस्तानी खेळाडूंचा सहभाग थांबवा, अशी मागणी भारतीय हॉकी महासंघाने (आयएचएफ) केली आहे. ‘‘भारतीय जवानांना ठार मारण्याचे क्रूर आणि अघोरी कृत्य पाकिस्तानने केले असले तरी त्यांच्याच खेळाडूंना हॉकी इंडियाने भारतात आमंत्रित केले आहे. त्यामुळे हॉकी इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंना आपल्या स्पर्धेत खेळण्याची अनुमती देऊ नये,’’ असे आयएचएफचे मुख्य सल्लागार के.पी.एस. गिल यांनी सांगितले.