भारतीय ऑलिम्पिक पथकाचा सदिच्छादूत म्हणून भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने चित्रपट अभिनेता सलमान खानची निवड केल्यानंतर देशभरात वादंग माजला आहे. मात्र सलमानच्या नियुक्तीमध्ये काहीच गैर नाही. चित्रपट ताऱ्यांमुळे आयपीएल हे क्रिकेट संघटनेसाठी फलदायी ठरले, असे गावस्कर यांनी सांगितले.
‘‘त्या व्यावसायाचा भाग नसलेला मात्र सर्वाना ज्ञात असलेला चेहरा हा मान भूषवतो आहे, यात चुकीचे काय आहे. खेळांमधील एखाद्या व्यक्तीपेक्षा जर तो अधिक जागृती निर्माण करीत असेल, तर त्यात गैर काहीच नाही,’’ असे गावस्कर म्हणाला.
‘‘चित्रपट ताऱ्यांमुळे आयपीएलची लोकप्रियता वाढली. चाहते मंडळी मोठय़ा संख्येने स्टेडियमपर्यंत पोहोचले. आयपीएलच्या क्रिकेटची जादू असली तरी शाहरूख खान, प्रीती झिंटा यांच्यासारखी मंडळी स्टेडियममध्ये असतात. त्यामुळे क्रिकेटचाहते त्यांना पाहायला येऊ लागली,’’ असे गावस्कर यावेळी म्हणाले.
गौतम गंभीरने मात्र याबाबत आपला विरोध केला तो म्हणाला, ‘‘देशाला अभिमान वाटणाऱ्या क्रीडापटूंची देशात मुळीच वानवा नाही. या क्रीडापटूंनी देशात अनेक महत्त्वाच्या गोष्टी केल्या आहेत. अभिनव बिंद्रा किंवा अन्य कुणी सदिच्छादूत झाला असता, तर मला अधिक आवडले असते.’’