दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकलेला भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आयपीएलसाठी तंदुरुस्त आणि सज्ज आहे. क्रिकेटमधील नवीन नियमांमुळे एकदिवसीय क्रिकेटपेक्षा ट्वेन्टी-२० क्रिकेट हे वेगवान गोलंदाजांसाठी सोपे असल्याचे मत इशांतने व्यक्त केले आहे.
‘‘मी पूर्णपणे तंदुरुस्त असून आयपीएल खेळण्यासाठी सज्ज झालो आहे. माझ्या मते एकदिवसीय क्रिकेटपेक्षा ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये गोलंदाजी करणे सोपे असते. एकदिवसीय क्रिकेटपेक्षा ट्वेन्टी-२०मध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ ठेवता येऊ शकतो. त्यामुळेच ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांना भेदक मारा करणे अधिक सोपे जाते,’’ असे इशांत म्हणाला.