विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यावर भारतीय संघाचे मायदेशात आगमन झाले आहे. भारताच्या पराभवानंतर समाजमाध्यमांवर टीकेचे धनी ठरलेले विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे प्रेमीयुगुल मुंबईमध्ये दाखल झाले.
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नवी दिल्लीला उतरण्यास प्राधान्य दिले असून तो तिथून रांचीला रवाना होणार आहे. कोहली आणि अनुष्का हातामध्ये हात गुंफत विमानतळावर उतरले. प्रसारमाध्यमांनी छायाचित्रांसाठी गर्दी केली. या वेळी प्रसारमाध्यमांनी कोहलीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो फोल ठरला. त्याने प्रसारमाध्यमांना संवाद साधण्याची संधी दिली नाही.  संघाचे संचालक रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हेदेखाली मुंबईलाच उतरले.