भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाला शनिवारी प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळविणारी ती दुसरी टेनिसपटू ठरली. यापूर्वी लिअँडर पेसला १९९६ मध्ये या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी क्रीडा मंत्रालयाने खेलरत्न पुरस्कारासाठी सानियाचे नाव निश्चित केले होते. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयाने क्रीडा मंत्रालयाला नोटीस पाठवत या निर्णयाला स्थगिती दिली होती. पॅरालिंपियन एच. एन. गिरीशा याने क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते. जागतिक क्रमवारीत दुहेरीमध्ये अव्वल स्थान मिळविल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने सानियाचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लंडन २०१२ पॅरालिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या गिरीशा याने आपणच या पुरस्कारासाठी लायक असल्याचे सांगून न्यायालयात या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. ‘क्रीडा मंत्रालयाच्या नियमावलीनुसार पुरस्कार दिले जातात. ज्याचे गुण अधिक ठरतात, त्याची पुरस्कारासाठी निवड केली जाते. त्यानुसार माझे ९० गुण होतात. सानिया याच्या जवळपासही नाही,‘ असे त्याने आपल्या याचिकेत म्हटले होते.