भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याने भारतीय जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संपूर्ण देशात आजपासून दिवाळीच्या सणाला सुरूवात झाली आहे. पुढील चार दिवस देशात दिवाळीचा उत्साह असतो. प्रत्येकजण आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत दिवाळीचा सण मोठ्या आनंदात साजरा करतो. अशावेळी देशाच्या सीमारेषेवर भारतीय जवान आपल्या कुटुंबियांपासून दूर असतात आणि आपले कर्तव्य बजावत असतात. देशाचे रक्षण करणाऱया जवानांमुळेच आपण आज मोठ्या आनंदाने आणि सुरक्षिततेने दिवाळी साजरी करतो. याचीच जाणीव ठेवून विराट कोहली याने ट्विटरवरून भारतीय जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सणासुदीच्या काळात आपल्या घरापासून दूर राहणे किती कठीण गोष्ट आहे, याची कल्पना मला आहे. ज्या सतर्कतेने भारतीय जवान आपले रक्षण करत असतात ते कौतुकास पात्र आहे. मी आणि संपूर्ण देशातील नागरिक आज भारतीय जवानांसोबत आहेत, असा संदेश विराट कोहली याने व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे. भारतीय संघ सध्या विशाखापट्ट्णम येथे दाखल झाला असून ऐन दिवाळीच्या दिवशी भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामना रंगणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी असल्याने अंतिम सामना निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱया सामन्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. Whenever you see a jawan, salute them. We get to celebrate festivals & live in peace because of them. Jai Hind #Sandesh2Soldiers pic.twitter.com/ncdZZ9qy9D — Virat Kohli (@imVkohli) October 27, 2016