श्रीलंकेच्या फलंदाजीचा एक मुख्य आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱया तिलकरत्ने दिलशान याने रविवारी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला पूर्णविराम दिला. दिलशानने दम्बुला येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱया एकदिवसीय सामन्यानंतर निवृत्ती पत्करली. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने धक्कादायक खुलासे केले. २०११ आणि २०१२ साली श्रीलंकेच्या संघाचे नेत्तृत्व करत असताना ड्रेसिंग रुममध्ये आपल्याला संघाकडून अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही, याची खंत असल्याचे दिलशानने म्हटले. तो म्हणाला की, मला संघाचे कर्णधारपद भुषविण्याची इच्छा नव्हती. मात्र, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कर्णधारपदासाठी योग्य व्यक्ती मिळत नाही तोवर सहा महिन्यांसाठी संघाचे कर्णधारपद सांभाळण्याची विनंती माझ्याकडे केली होती. त्यामुळे मी कर्णधारपद स्विकारले. पण माझ्या कर्णधारपदाच्या काळात संघाकडून मला योग्य पाठिंबा मिळाला नाही. दुर्देवाने तेव्हा संघाने दोन महत्त्वाचे गोलंदाज गमावले होते. मुरलीधरनने निवृत्ती स्विकारली होती, तर कुलसेकरा आणि अजंता मेंडिस यांना दुखापत झाली होती. त्यामुळे माझ्यासमोर गोलंदाजीचे खूप मर्यादित पर्याय उपलब्ध होते. अँजेलो मॅथ्युजनेही नेमके त्याचवेळी दुखापतीमुळे वर्षभर गोलंदाजी केली नाही. मात्र, मी कर्णधारपदावरून पायउतार होताच लगेचच पुढील दौऱयात मॅथ्युजने संघात पुनरागमन केले. त्यामुळे कर्णधारपदाचा काळ माझ्यासाठी कम नशीबीच ठरला, असेही तो पुढे म्हणाला. त्यानंतर २०११ साली विश्वचषकाच्या अंतिम फेरीत संघाला पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर कर्णधारपदापासून सर्वांनी दूर राहणेच पसंत केले. संघाची नेतृत्त्व करण्याची कुणाचीही तयारी नव्हती. जयवर्दने आणि संगकारा यांनीही आपली तलवार म्यान केली होती. माझा एक कामचलाऊ कर्णधार म्हणून उपयो केला गेला याची खंत मनात असल्याचे दिलशानने यावेळी म्हटले. दिलशानने ऑक्टोबर २०१३ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्याने ८७ सामन्यांत ५४९२ धावा आणि ३९ बळी मिळवले आहेत. रविवारी दिलशानने कारकीर्दीतील ३३०वा एकदिवसीय सामना खेळला. त्याने एकदिवसीय क्रिकेट सामन्यांत १०,२४८ धावा केल्या असून, १०६ बळी मिळवले आहेत.