क्रिकेटपटूही सरतेशेवटी माणूसच आहे. एक व्यावसायिक म्हणून तो क्रिकेट खेळतोही; पण खेळण्यासाठी जी अतिरिक्त ऊर्जा लागते ती आपल्या माणसांच्या प्रेमातूनच मिळत असते. आपल्या माणसांमध्ये जाऊन प्रत्येक जण ऊर्जा मिळवत असतो आणि त्याचा व्यावसायिक आयुष्यातही फायदा होतो. भारतीय क्रिकेटपटूंच्या बाबतीतही हेच घडले आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाला आठवडय़ाभराची विश्रांती मिळाली आणि त्यानंतर आता हे सारे क्रिकेटपटू ताजेतवाने होऊन कसोटी सामन्यासाठी उत्सुकतेने परतले आहेत. या विश्रांतीचा संघाला चांगलाच फायदा झाल्याचे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने मांडले आहे. ‘‘आम्ही बीसीसीआयकडे विश्रांतीची विनंती केली नव्हती. वेळापत्रकानुसार आम्हाला विश्रांती मिळाली आणि त्यामुळे वैयक्तिक आयुष्यासाठी थोडासा विसावा मिळाला. सुट्टीवरून परतल्यावर आता खेळाडू सरावासाठी आसुसलेले होते. या साऱ्या गोष्टींचा सकारात्मक परिणाम कामगिरीवर होईल,’’ असे कोहली म्हणाला. तळाच्या फलंदाजांची उपयुक्त खेळी या मालिकेत जेव्हा बिनीचे फलंदाज अपयशी ठरले तेव्हा तळाच्या फलंदाजांनी संघाची बाजू सावरली आहे. आतापर्यंतच्या मालिकेत तळाच्या फलंदाजांच्या योगदानामुळे आम्ही विजय मिळवू शकलो आहोत. त्यामुळे संघातील प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव आहे आणि प्रत्येक जण शंभर टक्के योगदान देण्यासाठी आतुर आहे, असे मत कोहलीने व्यक्त केले. जयंत यादव प्रभावी जयंत फक्त दोन कसोटी सामने खेळला आहे आणि त्यामध्ये त्याने मला प्रभावित केले आहे. सुरुवातीला तो फक्त गोलंदाज होता, पण आता आपण त्याला अष्टपैलू म्हणू शकतो. तो ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, क्षेत्ररक्षण सजवतो, हे सारे वाखाणण्याजोगे आहे, कारण एवढय़ा कमी वेळात त्याने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत मने जिंकली आहेत, असे कोहलीने सांगितले. बरेच पर्याय उपलब्ध संघात बरेच पर्याय उपलब्ध आहेत आणि प्रत्येक जण एकमेकांना सहकार्य करत आहेत. खेळाडूसाठी दुखापती काही नवीन नाहीत, पण एखादा खेळाडू जायबंदी झाला तर त्याच्या जागी कोणत्या खेळाडूला खेळवायचे याची चिंता आम्हाला नाही. संघातील स्थान मिळवण्यासाठी चांगली स्पर्धा असल्याने प्रत्येक जण खेळण्यासाठी आतुर आहे, असे कोहली म्हणाला. तेव्हा अजिंक्यने सावरले! न्यूझीलंडविरुद्ध जेव्हा मला जास्त धावा करता येत नव्हत्या, तेव्हा अजिंक्य रहाणेने दमदार फलंदाजी करत संघाला सावरले होते. सध्याच्या घडीला त्याच्याकडून धावा होत नसल्या तरी त्यामुळे त्याला संघातून डच्चू देता येऊ शकत नाही, असे प्रतिपादन कोहलीने केले. संघाची एकजूट महत्त्वाची संघातील सारेच खेळाडू चांगली कामगिरी करतात असे नाही. एखादा खेळाडू मोठी खेळी खेळून जातो, तर एखाद्या खेळाडूला अपेक्षेनुरूप कामगिरी करता येत नाही; पण एक संघ म्हणून माझ्यासाठी सारे खेळाडू सारखेच आहेत, कारण प्रत्येक खेळाडूच्या योगदानामुळेच संघ विजयी ठरत असतो. भारतीय संघात सर्वानुमते निर्णय ठरवले जातात आणि त्याचे पालनही केले जाते, असे कोहलीने सांगितले. अजून आक्रमक खेळायला हवे - कुक मुंबई : ‘‘मी आणि प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी आतापर्यंतच्या कामगिरीवर चर्चा केली आणि त्यामधून आम्ही अजून आक्रमक खेळायला हवे, हे फलित निघाले आहे. त्यामुळे या सामन्यापासून आम्ही अधिक आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न करू,’’ असे इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकने सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. ‘‘राजकोटच्या सामन्यात आमच्याकडून चांगला खेळ झाला; पण त्यामध्ये आम्हाला सातत्य राखता आले नाही. विशाखापट्टणम्च्या सामन्यात आम्हाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही; पण तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आम्हाला विश्रांती करण्याची संधी मिळाली आणि त्याचा आम्हाला या कसोटीमध्ये नक्कीच फायदा होईल,’’ असे कुक म्हणाला. मुंबईचा इतिहास आमच्या बाजूनेच ‘‘आतापर्यंत वानखेडे स्टेडियमवरचा इतिहास पाहिला तर तो आमच्या बाजूनेच आहे. वानखेडे स्टेडियमवर आमच्याकडून नेहमीच चांगली कामगिरी झाली आहे. त्यामुळे या सामन्यात आमच्याकडून चांगली कामगिरी होईल,’’ अशी आशा कुकने प्रकट केली.