भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांचा गुरूवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या तिघांसोबतच क्रिकेटपटू शेकर नाईक, पॅरालिम्पिक पदक विजेती दिपा मलिक, मरियप्पन थांगावेलू, हॉकीपटू श्रीजेश, थाळीफेकपटू विकास गौडा यांनाही पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

क्रीडा क्षेत्रात आपल्यातील कलागुणांनी सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱयांचा भारत सरकारकडून दरवर्षी पद्म पुरस्कारांनी सन्मान करण्यात येतो. भारतीय संघाचा युवा कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही वर्षात क्रिकेट विश्वात आपल्या दमदार कामगिरीने आपली वेगळी ओळख निर्माण केली. कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने लागोपाठ सात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. याशिवाय, कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय कसोटी संघाने क्रमवारीत अव्वल स्थान देखील कायम ठेवले. विराटने आपल्या वैयक्तिक कामगिरीनेही देशाचे नाव उंचावले आहे. गेल्या वर्षभरात सर्वाधिक धावा करणाऱयांच्या यादीत कोहली अव्वल होता.

 

महिला कुस्तीमध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून देणारी साक्षी मलिक पहिला भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पथकातील दिग्गजांकडून निराशा होत असताना साक्षीने पदक मिळवून भारताचे खाते उघडले होते. याच ऑलिम्पिक स्पर्धेत कलात्मक जिम्नॅस्टमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारी दीपा कर्माकर देखील पद्मश्री पुरस्काराची मानकरी ठरली. जिम्नॅस्टीक्सच्या प्रोड्युनोव्हा प्रकारात हातखंडा असलेल्या दीपा कर्माकरने रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंना तगडे आव्हान दिले होते. दिपाचे कांस्यपदक काही गुणांच्या फरकाने हुकले होते. दिपाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. असे असले तरी टोकियो २०२० साली होणाऱया ऑलिम्पिकमध्ये सोनेरी कामगिरी करण्यासाठी रिओ ऑलिम्पिकमधील कामगिरीचा खूप फायदा होणार असल्याचेही तिने सांगितले.