कसोटीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने एकदिवसीय प्रकारातही अव्वल स्थान मिळवले आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला मागे टाकले. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका सुरू आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे. पहिल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईसनुसार ऑस्ट्रेलियाचा २६ धावांनी पराभव केला होता. तर काल कोलकातामध्ये ईडन गार्डनवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर ५० धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने एकदिवसीय जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. कसोटीतही भारतीय संघ १२५ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिका संघाचे ११० गुण आहेत. तत्पूर्वी कोलकातातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियाला २५३ धावांचे आव्हान दिले होते. ते ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना पेलवले नाही. भारताने ५० धावांनी विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली. भारताकडून कुलदीप यादवने सामन्यात हॅट्ट्रिकची नोंद केली. एकदिवसीय सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. भुवनेश्वर कुमारनेही ३ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहलनेही प्रत्येकी दोन गडी बाद केले.