हॉकीमध्ये भारताचा पाकिस्तानवर विजय ; क्रिकेटमध्ये भारत पाकिस्तानकडून पराभूत
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कुठलाही सामना असो रोमहर्षक या शब्दाला साजेसा खेळ पाहायला मिळतो.. प्रचंड दडपण असतंच, प्रत्येक श्वासागणिक उसासे सोडले जातात.. हृदय वेगानं धडधडायला लागतं.. श्वास रोखले जातात.. जिंकल्यावर डोक्यावर घेऊन नाचलं जातं, तर पराभूत झाल्यावर लचके तोडायलाही चाहते मागेपुढे पाहत नाहीत.. दोन्ही देशांचे खेळाडू मैदानात नव्हे तर रणांगणात असल्याचा भास होतो आणि समोर सुरू असलेला सामना हे जणू युद्धच आहे, असं वाटायला लागतं.. मंगळवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन विविध लढती पाहायला मिळाल्या आणि दोन्हीही सामने चांगलेच अटीतटीचे झाले. आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत भारताने पाकिस्तानला २-१ असे पराभूत करत ‘नाताळ’ साजरा केला. या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने स्पर्धेत अंतिम फेरीत मजल मारली. तर दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील  पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. क्षमतेनुसार खेळ केला असता तर भारतीय संघाला विजयाची संधी होती, पण या वेळी त्यांनी आपल्या लौकिकाला हरताळ फासला आणि संघावर पराभवाची नामुष्की ओढवली. पाकिस्तानने भारतावर भेदक गोलंदाजी आणि कर्णधार मोहम्मद हफिझ व शोएब मलिक यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ५ बळी आणि २ चेंडू राखत मात केली.