आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग शाब्दिक हल्ल्यांसाठी ओळखला जायचा. आताही त्याच्या या वृत्तीमध्ये कोणताच बदल झालेला नसून शाब्दिक हल्ले हे खेळाचाच एक भाग आहे, पण खेळाडूंना आपल्या मर्यादांची जाणीव असायला हवी, असे मत पॉन्टिंगने व्यक्त केले आहे.
‘‘ शाब्दिक हल्ले हा खेळाचाच एक भाग आहे. पण या गोष्टीची लक्ष्मणरेषा कोणती हे खेळाडूंनी समजून घ्यायला हवे. कारण प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा असतात. त्यानुसारच त्यांनी वागायला हवे आणि हेच मी खेळाडूंना समजावत आहे,’’ असे पॉन्टिंग म्हणाला.
विश्वचषकानंतर काही दिवसांमध्येच आयपीएलला सुरुवात होणार आहे. संघांच्या सराव शिबिराला सुरुवात झाली असून प्रत्येक संघाने जेतेपदासाठी मेहनत घ्यायला सुरुवात केली आहे. पॉन्टिंग पुढे म्हणाला की, ‘‘विश्वचषक किंवा त्यापूर्वी नेमके काय झाले याची काळजी आम्हाला नाही, तर आयपीएलमध्ये खेळाडू कसे खेळतील, याची काळजी आम्हाला आहे. खेळाडूंना योग्यपद्धतीने हाताळणे हे आमचे काम आहे आणि सध्याच्या घडीला त्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.’’