लंडन येथे सुरु असलेल्या वर्ल्ड हॉकीलीग सेमीफायनल स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर पुन्हा एकदा मात केली आहे. ५ व्या - ८ व्या क्रमांकासाठी खेळवल्या गेलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६-१ असा धुव्वा उडवला. उपांत्यपुर्व फेरीत भारताचं आव्हान मलेशियाकडून संपुष्टात आलं होतं. ३-२ असा पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताला आज परत पाकिस्तानशी सामना करावा लागला. याआधी साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानला ७-१ अशी धूळ चारली होती. त्यामुळे अखेरच्या सामन्यातही पाकिस्तानवर मात करुन भारत स्पर्धेचा शेवट गोड करणार का याकडे सर्व भारतीयांच्या नजरा लागलेल्या होत्या. प्रत्यक्ष सामन्यातही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानवर पहिल्या मिनीटापासून दबाव टाकायला सुरुवात केली. ८ व्या मिनीटाला रमणदीप सिंहने भारताचं खात उघडलं. या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फळीतल्या खेळाडूंचा ताळमेळ हा अव्वल दर्जाचा होता. आकाशदीप सिंह, रमणदीप सिंह, एस.व्ही. सुनील यांनी सुरेख चाली रचत पाकिस्तानी आक्रमण अक्षरशः उध्वस्त करुन टाकलं. भारतीय खेळाडूच्या एकाही चालीचं उत्तर पाकिस्तानी खेळाडूंकडे दिसतं नव्हतं. अशातचं भारताने पाकिस्तानवर लागोपाट दुसरा हल्ला चढवला. २५ व्या मिनीटाला प्रदीप मोरने लगावलेल्या एका जोरदार फटक्याला तलविंदर सिंहने हलकेच दिशा देत बॉल गोलपोस्टमध्ये ढकलण्याचं काम केलं आणि भारताची आघाडी २-० अशी वाढवली. हा गोल इतक्या सहजतेने झाला की पाकिस्तानी गोलरक्षक अमजद अली आणि इतर खेळाडूंना त्यावर व्यक्त होण्याचाही वेळ मिळाला नाही. या गोलनंतर भारतीय खेळाडूंनी मागे वळून पाहिलचं नाही. २७ व्या मिनीटाला रमणदीप सिंह आणि आकाशदीप सिंह ने सुरेख चाल रचत पाकिस्तानच्या पेनल्टी क्षेत्रात प्रवेश केला. यावेळी दोन्ही खेळाडूंनी छोटे-छोटे पास करतं पाकिस्तानी बचावपटूंना बॉलचा ताबा मिळवणं कठीण करुन टाकलं. अखेर आकाशदीप सिंह बॉल गोलपोस्टमध्ये ढकलत भारताची आघाडी ३-० ने वाढवली. पाठोपाठ २८ व्या मिनीटाला एस.व्ही. सुनीलच्या पासवर रमणदीप सिंहने बॉल परत गोलपोस्टमध्ये ढकलत पाकिस्तानला सामन्यात पुरतं पाठीमागे ढकललं. अखेर दुसरं सत्र संपत असताना भारताकडे ४-० अशी मोठी आघाडी होती. रमणदीप सिंहची या स्पर्धेतली एकंदरीत कामगिरी ही खरंच वाखणण्याजोगी आहे. सर्वाधीक गोल करणाऱ्यांच्या यादीत रमणदीप तिसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या सत्रात पाकिस्तानने आपल्या संघात बदल करत गोलरक्षक अमजद अलीच्या जागी मजहरला मैदानात उतरवलं. मात्र भारतीय खेळाडूंनी आपला धडाका या सत्रातही कायम ठेवला. भारतीय खेळाडूला चुकीच्या पद्धतीने टॅकल करणाऱ्या अबु बकरची चलाखी पंचांच्या नजरेतून सुटली नाही. भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा हरमनप्रीत सिंहने पुरेपूर फायदा उचलत ३६ व्या मिनीटाला भारताला ५-० अशी आघाडी मिळवून दिली. यावेळी हरमनप्रीतने ऐनवेळेला आपली जागा बदलत पाकिस्तानी गोलरक्षकाच्या डाव्या बाजूवर आक्रमण करत सुरेख गोल झळकावला. पाकिस्तानला पहिला गोल झळकावण्यात यश आलं ते तिसऱ्या सत्रात. पाकिस्तानच्या आघाडीतल्या फळीच्या खेळाडूंनी रचलेल्या चालीत भारताचे बचावपटू काही वेळासाठी गोंधळले. चिंगलीन सानाला आपल्या बॉलवर ताबा ठेवणं जमलं नाही, याचाच फायदा पाकिस्तानच्या अहमद ऐजाजने घेत पाकिस्तानसाठी ४१ व्या मिनीटाला पहिला गोल झळकावला. अखेरच्या सत्रात पाकिस्तानी खेळाडूंनी मात्र भारताला फार आक्रमण करण्याच्या संधी दिल्या नाहीत. पाकिस्तानचा बदली गोलरक्षक मजहरने भारतीय खेळाडूंचे अनेक मनसुबे धुळीला मिळवले. रमणदीप सिंहचा गोल करण्याचा सुरेख प्रयत्न पाकिस्तानच्या मोहम्मद ज्युनियरने हाणून पाडला. मात्र अखेर सामना संपायला अवघी काही मिनीटं बाकी असताना मनदीप सिंहने पाकिस्तानचा बचाव भेदत भारताला ६-१ अशी आघाडी मिळवून दिली. शेवटची ९ सेकंद बाकी असताना भारताला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र हरमनप्रीतने मारलेला फटका गोलपोस्टच्या बाहेर गेल्याने ही संधी वाया गेली, आणि भारताने हा सामना ६-१ अशा मोठ्या फरकाने जिंकला. संपूर्ण सामन्यात भारतीय संघाने केलेला खेळ परिपूर्ण होता. उद्या ५ व्या ६ व्या क्रमांकासाठी भारताचा सामना कॅनडाविरुद्ध होणार आहे. यास्पर्धेनंतर वर्ल्ड हॉकीलीग फायनल आणि हॉकी विश्वचषक या स्पर्धा भारतात होणार आहेत. या स्पर्धेतील कामगिरीचा भारताच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही, यजमान देश म्हणून भारताचा दोन्ही स्पर्धांमधला प्रवेश निश्चीत आहे. मात्र अखेरच्या सामन्यात विजय मिळवत आत्मविश्वासाने भारतात परतण्याचा भारतीय संघाचा मानस असणार आहे.